मिथिलेश जोशी
खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची औपचारिकता शुक्रवारी पार पडली. गेले काही महिने ते ज्या पद्धतीने पक्षनेतृत्वावर आरोप करत होते त्यावरून भारतीय जनता पक्षाला खडसे पक्ष सोडणार हे अपेक्षितच होते. जनसंघाच्या काळापासून संघ परिवाराच्या छायेत वाढलेल्या या नेत्याच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला काय लाभ होणार? हा मुख्य मुद्दा आहे.
मध्य प्रदेश आणि गुजरातच्या सीमेवरील उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदूरबार या तीन जिल्ह्यांमध्ये एकनाथ खडसे यांचे राजकीय नेतृत्व बहरले. त्यांनी राज्यभर आपल्या समर्थकांची फौज निर्माण केली असली तरी उत्तर महाराष्ट्र हाच त्यांचा बालेकिल्ला राहिला आहे. या भागात खडसेंच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला आपला पाया भक्कम करणे शक्य होणार आहे.
या भागातून चार खासदार निवडले जातात तेथे राष्ट्रवादीचा एकही खासदार निवडून आलेला नाही. जळगाव जिल्ह्यात 11 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात केवळ अंमळनेरमध्ये राष्ट्रवादीचा आमदार आहे. उत्तर महाराष्ट्रात 54 मतदारसंघ असून तेथे राष्ट्रवादीचे कधीच प्राबल्य नव्हते. कोणतीही जिल्हा परिषद अथवा दूध संघ, बाजार समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात नाही.
या जिल्ह्यांमध्ये भाजपा, शिवसेना आणि कॉंग्रेसचे उत्तम अस्तित्व आहे. खडसेंचे वास्तव्य असणाऱ्या जळगाव महापालिकेत भाजपाचीच सत्ता आहे. त्या भागात राष्ट्रवादी पाळेमुळे रुजवण्याचा प्रयत्न यामुळे राष्ट्रवादी सफल होणार आहे.
खडसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र, खडसे यांच्या कुटुंबीयांनी राष्ट्रवादीला पसंती दिल्याचे विश्वासनीयरित्या समजते. या भागात राष्ट्रवादीकडे बळकट नेता नसल्याने त्यांनी राष्ट्रवादीला पसंती दिली.
राष्ट्रवादीचाही पश्चिम महाराष्ट्र वगळता फारसा विस्तार झालेला नाही. शरद पवार यांच्या नावाचा दबदबा संपूर्ण राज्यात असला तरी राज्यात सर्वदूर पक्षाची पाळेमुळे रुजवण्यात ते असमर्थ ठरले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. खडसे लेवा पाटील या जातीचे असून त्यांचा या भागात तळागाळापर्यंत संपर्क आहे. त्याचा लाभ पक्षाला होऊ शकतो. जळगाव जिल्ह्यात सध्या महाविकास आघाडीचे केवळ तीन आमदार आहेत. खडसेंच्या प्रवेशाने त्यात बदल होऊ शकतो.
इतर मागासवर्गीयांचा चेहरा मिळाला
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मराठा नेत्यांची संख्या अधिक आहे. तसेच अन्य जातींच्या नेत्यांची संख्या कमी आहे. खडसे यांच्या रूपाने राष्ट्रवादीला इतर मागास वर्गीय नेत्याचा एक चेहरा मिळाला आहे. राज्यात मराठा मतदारांची संख्या 32 टक्के आहे तर इतर मागासवर्गीयांची संख्या 19 टक्के आहे. सध्या पक्षकडे इतर मागासवर्गीयांमध्ये छगन भुजबळ यांसारखा चेहरा होता. मात्र, आता राष्ट्रवादीचा ओबीसींचा नेता म्हणून खडसेंना पुढे आणले जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसे यांना राष्ट्रवादीत यथोचित सन्मान केला जाण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यांची कन्या रोहिणी यांना सन्मानजनक पद मिळण्याचे संकेत आहेत. त्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अध्यक्ष आहेत.