नवी दिल्ली – चांद्रयान-3 मोहिमेच्या यशामुळे उत्साही, इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी सांगितले की, भारतीय अंतराळ संशोधकांचे चंद्राबाबतीतले स्वारस्य अद्याप संपलेले नाही आणि इस्रो आता त्याच्या पृष्ठभागावरून काही खडक आणण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. सोमनाथ यांनी येथील राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्र येथे राष्ट्रपती भवन विमर्श मालिकेवरील व्याख्यानात चंद्रावरून खडक आणण्याच्या मोहिमेचा तपशील सादर केला.
चंद्र आणि सूर्याचा वेध घेतल्यानंतर भारत मंगळ आणि शुक्र ग्रहांवर पोहोचण्याच्या तयारीत आहे; इस्रो या दिवसाची तयारी करत आहे, असे सांगून सोमनाथ पुढे म्हणाले की, चंद्राविषयीचे बरेच संशोधन अद्याप बाकी आहे. मी राष्ट्रपतींना आश्वासन देतो की आम्ही चंद्रावरून काही खडक नक्कीच आणू.
हे नमुने आणण्याचे मिशन खूप गुंतागुंतीचे आहे आणि सर्व काही स्वायत्तपणे करावे लागेल. म्हणून आम्ही सध्या अशाच एका मिशनवर काम करत आहोत आणि येत्या चार वर्षांत ते पूर्ण करू इच्छितो. हे आमचे ध्येय आहे. आपल्या सुमारे ४० मिनिटांच्या संभाषणादरम्यान, सोमनाथ म्हणाले की, भारतीय व्यक्तीला अंतराळात पाठवण्याची गगनयान मोहीम वेगाने सुरू आहे.