कोल्हापूर – कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य हे बालिश आहे. त्यांनी केवळ आपल्या नेत्यांना खूश करण्यासाठी ते वक्तव्य केले असून कर्नाटकच्या मंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान देण्याची भाषा करू नये, असे सडेतोड उत्तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना दिले आहे.
कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. उदय सामंत म्हणाले, कर्नाटक राज्याचा स्थापना दिवसानिमित्त सीमावर्तीय मराठी भाषिकांनी काळा दिवस पाळणार असल्याचे घोषित केले होते.
मात्र, कर्नाटक सरकारकडून पोलीस बळाचा वापर करून वारंवार या आंदोलनाविरोधात दडपशाहीचा पवित्रा घेताना दिसून येत आहे. तसेच शनिवारी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग असून सूर्य-चंद्र असेपर्यंत तो महाराष्ट्राला कधीही मिळणार नाही, असे बेताल वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध व्यक्त होत आहे.