एखादे संपूर्ण कुटुंबसुद्धा आत्मघातकी दहशतवादी असू शकते हे दाहक वास्तव आहे. निरागस मुलेसुद्धा यात एक “शस्त्र’ म्हणून वापरली जात आहेत.
इंडोनेशियात एक कुटुंब सकाळी घराबाहेर बाहेर पडते. आई-वडील, त्यांची 18 आणि 16 वर्षांची दोन मुले आणि 12 आणि 9 वर्षांच्या दोन मुली. पण हे घराबाहेर पडले ते सर्वसाधारण कुटुंबाप्रमाणे फिरायला नाही, तर ते निघाले होते एका मिशनवर. घरी कधीच परत न येण्यासाठी… ते सगळे निघाले होते आत्मघातकी हल्ला करायला. या हल्ल्यामुळे जग हादरले. इंडोनेशियात 13 मे 2018 रोजी सुरबाया येथे तीन चर्चवर आत्मघातकी हल्ले केले गेले. कुटुंबच एक युनिट बनून दहशतवादी हल्ला घडवू शकते हे वास्तव पचवणे जगाला खूप कठीण गेले. दहशतवादी किती क्रूरपणे कुटुंबच्या-कुटुंबे आपल्या ध्येयपूर्तीसाठी “वापरतात’ हे सिद्ध होते.
जगातील दहशतवादी संघटनांवर दृष्टिक्षेप टाकला तरी असे दिसून येते की ते आपले साध्य पूर्ण करण्यासाठी जाणीवपूर्वक आणि नियोजनबद्ध प्रयत्न करतात. विशेषतः मुलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. अल कायदा या संघटनेने तर लहान मुलांना भरती करण्यासाठी तसेच त्यांच्यात आपली जहाल विचारसरणी निर्माण करण्यासाठीही “स्पेशल मीडिया प्लॅन’ तयार केलेला आहे. काही मुले इंटरनेटवरील जहाल धार्मिक प्रचाराला बळी पडतात. ईमेल, फेसबुक, यूट्युब तसेच अनेक ऑनलाइन/व्हर्च्युअल गट याद्वारे किशोरवयीन मुले दहशतवादी संघटनेला बळी पडतात. लहान मुलांपासून किशोरावस्थेतील मुलांपर्यंत दहशतवादी साहित्य, गेम्स, कार्टून, गाणी इत्यादी इंटरनेटवर उपलब्ध केले जाते. त्यात लहान मुलांवर प्रभाव पडेल असे त्याचे स्वरूप असते. दहशतवादी मुलांना “कब ऑफ खलीफत’ यासारखी संबोधने देऊन बाकीच्या मुलांनाही तसे बनण्यासाठी आग्रह केला जातो. काही ठिकाणी तर त्यासाठी खास प्रोडक्शन हाउसेस आहेत.
वेगवेगळ्या स्वरूपात हिंसेचे समर्थन केले जाते. “बर्ड ऑफ पॅरेडाइज’ नावाचे एक प्रोडक्शन हाउस आहे. अशी मान्यता आहे की जी मुले वयात येण्यापूर्वी स्वर्गवासी होतात ती थेट स्वर्गात जातात. त्यांचे रुपांतर पक्षात होते. ते अमरत्त्वाची गाणी गातात. या संस्थेच्या व्हिडिओमध्ये दाखवले आहे की मुलांचे रूपांतर हे शत्रूच्या मारेकऱ्यांमध्ये होते. मुले या गोष्टींचे अनुकरण करतात. इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाइन हा संघर्ष जेव्हा विकोपाला गेलेला होता तेव्हा नव्या पिढीला इस्रायलच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी प्रशिक्षण देणे, इस्रायलद्वेष भिणवणे यासाठी अशा साहित्याचा, व्हिडिओचा वापर केला गेला.
आणखी जहाल उदाहरण म्हणजे इसीसचे आहे. साधारणपणे 2014 मध्ये इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया या दहशतवादी संघटनेने सीरियामधील “अल बुकामल’ या भागावर कब्जा केला. तेथील शाळांवर ताबा मिळवला. सगळीकडे इसिसचे राज्य होते. त्यावेळी कुणाला पटो वा ना पटो जे शिक्षण इसिस मुलांना देत होती त्याला होकार देण्याशिवाय स्थानिकांना पर्याय नव्हताच. अबू शहेद हे त्या भागातील रहिवासी होते. त्यांनी त्यांचा अनुभव कथन केला आहे. जेव्हापासून इसिसने त्या भागाचा आणि शाळेचा ताबा घेतला तेव्हापासून त्यांचा अकरा वर्षांचा मुलगा पूर्णत; बदलला. त्याचे वागणे बदलले. त्याच्या पुस्तकात शस्त्रास्त्रांची चित्रे आणि काळे झेंडे दिसू लागले.
आपल्या घरात जणू छोटा हेरच वावरत आहे असे त्यांना जाणवू लागले. त्यांची पत्नी उम शाहेद म्हणते की या मुलाच्या सहवासात त्यांना असह्य वाटे. पुस्तकात बेरजा-वजाबाक्या शिकवताना बंदुका-रणगाड्यांची चित्रे वापरलेली गेली. पेन, पक्षी आणि फळे या ऐवजी थेट रणगाडे, चाकू, बंदुका यांची चित्रे वापरलेली दिसून येतात. घड्याळ शिकवताना टाइमबॉम्बच्या चित्रावरचे घड्याळ आहे. शिक्षकही मान्य करतात की मुलाना जणू दहशतवादी बनवण्याचे प्रशिक्षण द्यावे लागत होते. इसिसच्या सक्तीमुळे कोणी काहीही विरोध करू शकले नाही. जेव्हा ह्या भागातून इसिसचे वर्चस्व संपले तेव्हा हे सर्व जगासमोर आले. तेथे मग युनिसेफच्या माध्यमातून सेवा दिली गेली. वातावरण पुन्हा सर्वसामान्य करण्यासाठी प्रयत्न केले गेले. युनिसेफच्या प्रवक्त्या तमारा कुम्मर यांनी म्हटले होते की, सीरियाच्या सर्व मुलांना आता शिक्षणक्रमासाठी आणखी मदतीची गरज आहे. त्यांनी जे भयंकर अनुभवले आहे त्या धक्क्यातून त्यांना बाहेर पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली गेली पाहिजेत.
नायजेरियामध्ये 2009 साली बोको हराम या संघटनेने 8 हजार मुलांना आपल्या दहशतवादी संघटनेत भरती करून घेतले, असे काही संदर्भ सापडतात. काही वेळा तर लहान मुलांना संघटनेशी असणारी बांधिलकी सिद्ध करण्यासाठी स्वत:च्या कुटुंबाला ठार मारणे/उद्ध्वस्त करणे यासारख्या अटी ठेवल्या जातात. लहान मुलामुलींना “ह्युमन शिल्ड’ म्हणजे मानवी ढाल म्हणून वापरले जाते. मे 2015 मध्ये 12 वर्षांच्या मुलीने नायजेरियातील योबे स्टेट- दमतुरा येथे बसस्टॅंडवर बॉम्बस्फोट घडवून आणला होता.
2015 मध्ये इसीसने 274 मुलांची सीरियामधून भरती केली होती. आलेप्पो आणि राक्का येथे इसिसची लष्करी प्रशिक्षण केंद्रे होती. त्यात 10 ते 15 वर्षांच्या 124 मुलांना प्रशिक्षण देण्यात आले होते. तसेच यात 18 केसेसमध्ये तर मुले केवळ सात वर्षांची होती. जून आणि सप्टेंबर 2015 मध्ये 1000 मुलांना इसिसने इराकच्या मोसुलमधून ताब्यात घेतलेले होते. केनिया आणि सोमालिया या ठिकाणी सक्रिय असणाऱ्या “अल-शबाब’ या दहशतवादी संघटनेनेसुद्धा मुलांची भरती केलेली आहे.
इसिस आणि बोको हराम या संघटना सदस्यसंख्या वाढवण्यासाठी मुलांची भरती करतात. संघटनेची व्याप्ती वाढवणे तसेच समाजावर आपला प्रभाव वाढवणे ही मुख्य कारणे असतात. मुलांवर कुणी फारसा संशय घेत नाहीत. त्यामुळे त्यांच्याद्वारे हल्ला चढवणे सोपे असते. ज्या देशात गरिबी मोठ्या प्रमाणात आहे तेथे मुलाना खेळणी, खाऊ आणि जे त्यांचे पालक देऊ शकत नाहीत त्यांचे प्रलोभन दाखवले जाते. किशोरवयीन मुलांना शस्त्रे चालवणे, त्याचा संबंध पराक्रमाशी, अमर होण्याशी जोडणे. काही वेळा तर पैशाचे आमिषसुद्धा दाखवले जाते. मुलांच्या गरजा कमी असतात. मुलांवर नियंत्रण ठेवणे सोपे असते.
एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, मुलींनी दहशतवादी हल्ला केल्यास संघटनेला जास्त प्रसिद्धी मिळते. शिवाय, मुलींच्या सदस्यत्त्वामुळे गटाची आकर्षण शक्ती वाढते. बऱ्याच जणींची फसवणूक झालेली आहे. पण सगळे उघडकीला येते असे नाही. वैयक्तिक कारणे, कौटुंबिक अडचणी, आर्थिक गरजा यामुळे लहान मुले तसेच किशोरवयीन मुले दहशतवादी संघटनांना बळी पडतात. पॅलेस्टाइनमध्ये तर लहानपणापासूनच दहशतवाद माहीत असतो. तिथे आत्मघातकी दहशतवादाचा स्वीकार आणि समर्थन आढळते. लहान मुलांना खेळण्यातले आत्मघातकी बॉम्बबेल्ट दिले जातात. असे संदर्भ आढळतात की, हमासद्वारे चालवली जाणारी जी बालवाडी आहे तिथे भिंतीवर लिहिले आहे, “बालवाडीतील मुले ही उद्याचे शहीद आहेत.’ तिथे दहा-अकरा वर्षांची मुलेही आत्मघातकी बॉम्बर बनून इस्रायलच्या जनतेचा जीव घेण्याची स्वप्ने पहातात. ही वस्तुस्थिती आहे.
वेस्ट बॅंकमधील अल नाझहा आणि गाझामधील इस्लामिक युनिव्हर्सिटी येथील वर्गांमध्ये लिहिलेले आहे की, “इस्रायलकडे अणुबॉम्ब आहेत आमच्याकडे मानवीबॉम्ब’. हमासने 8 डिसेंबर 2016 रोजी एका लहान मुलाचा लष्करी पोषाखातील मोठ्या रायफलसह फोटो ट्विटर अपलोड करून म्हटले की “पिढ्यान्पिढ्या हमास त्याची प्रतिष्ठा आणि ताकद वाढवत आहे’. थोडक्यात, भावी पिढीला जाणीवपूर्वक बिघडवण्याचे प्रयत्न केले जातात. पालकांनी सुजाणपणे मुलांसोबत संवाद वाढवणे, मुलांबाबत जागरूक रहाणे महत्त्वाचे आहे.