शेअर बाजारातील तेजीमुळे मध्यंतरीच्या काळात चिंताक्रांत झालेल्या गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर दिलाशाची लकेर उमटली आहे.
रशिया-युक्रेन युद्धाची सुरुवात झाल्यानंतर जगभरातील शेअर बाजारात मोठी पडझड दिसून आली. भारतीय शेअर बाजारही त्याला अपवाद ठरू शकला नाही. वास्तविक, कोविडच्या संकटातून सावरल्यानंतर भारतीय शेअर बाजाराने एका मागून एक टप्पे गाठत उच्चांक प्रस्थापित केले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असणाऱ्या निफ्टीने 18,600 ची पातळी गाठली; तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असणाऱ्या सेन्सेक्सने 62,245 ही उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र, ऑक्टोबर 2021 पासून बाजारात काहीशी घसरण ठळकपणाने जाणवण्यास सुरुवात झाली होती. सुरुवातीला त्याकडे नफावसुली म्हणून पाहिले गेले; परंतु या घसरणीचे मुख्य कारण विदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा मारा हे होते.
2020 मध्ये कोविड महामारीनंतर गडगडलेल्या शेअर बाजारात अक्षरशः कवडीमोल दराने विदेशी गुंतवणूकदारांनी समभागांची तुफान खरेदी केली. 2020 मध्ये 64,379 कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली होती. याचे एक कारण म्हणजे अमेरिकेसह अनेक देशांमध्ये तेथील सरकारांनी अर्थव्यवस्थेमध्ये प्रचंड पैसा ओतला होता. हा पैसा भारतासारख्या देशांच्या बाजारात आला; परंतु 2021 मध्ये 92,729 कोटींचे समभाग विकले. ही विक्री प्रामुख्याने उत्तरार्धात सुरू झाली होती. रशिया-युक्रेन युद्धानंतर जगभरातील बाजार गडगडल्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांसह बड्या गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली.
दुसरीकडे महागाईचा महाराक्षस मोठे आव्हान बनून उभा राहिल्यामुळे जागतिक पातळीवर केंद्रीय बॅंकांकडून महागाई नियंत्रणासाठी व्याजदरवाढीचे चक्र सुरू झाले. कोविड काळात ओतलेला पैसा काढून घेण्यास सुरुवात झाली. यामुळे विदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा मारा आणखी वाढला. म्हणजे 2022 मध्ये जुलै अखेरीपर्यंत एफआयआयकडून तब्बल 2,91,019 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री करण्यात आली आहे. साहजिकच यामुळे भारतीय शेअर बाजारात मध्यंतरीच्या काळात मोठी घसरण पाहायला मिळाली. अनेक दिग्गज कंपन्यांचे, स्मॉलकॅप, मिडकॅप कंपन्यांचे समभाग हे 52 आठवड्यांतील नीचांकी पातळीजवळ येऊन ठेपले. परिणामी निफ्टीने 15,183 च्या तर सेन्सेक्स 50,921 च्या पातळीवर आलेला पाहायला मिळाला. खरे म्हणजे विदेशी गुंतवणूकदारांकडून तुफानी विक्री होऊनही भारतीय बाजारात फार मोठी घसरण झाली नाही. याचे कारण देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांकडून म्हणजेच डीआयआयकडून आणि किरकोळ गुंतवणूकदारांकडून घसरणीच्या काळात सातत्याने खरेदी होत राहिली. उदाहरणच घ्यायचे झाल्यास 2021 मध्ये डीआयआयकडून 94,574 कोटींच्या समभागांची खरेदी झाली होती; तर 2022 मध्ये जुलै महिन्याखेरीपर्यंत 2,42,513 कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी करण्यात आली आहे.
या खरेदीमुळेच 15,200 च्या पातळीवरून जुलै महिन्यापर्यंत हळूहळू करत भारतीय शेअर बाजाराने मोठी मजल मारली. जवळपास 16,200 पर्यंत निफ्टी वधारला. यादरम्यान अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरवाढीचा एक धक्का देऊन झाला होता. ब्रिटन, युरोपमध्येही व्याजांचे दर वाढवण्याचे सत्र सुरू झाले होते. भारतीय रिझर्व्ह बॅंकेनेही रेपो दरांमध्ये दोन वेळा वाढ केली. दुसरीकडे रुपयाची घसरण विक्रमी पातळीवर गेली होती. फेडकडून महागाई नियंत्रणासाठी व्याजदरात आणखी 75 बेसिस अंकांची वाढ करण्याचे सूतोवाचही करण्यात आले होते. याची घोषणा 27 जुलै रोजी होणार होती. यादरम्यान अमेरिकन महागाईचे आकडे समोर आले आणि 40 वर्षांतील उच्चांकी पातळीवर अमेरिकन महागाई पोहोचल्याचे स्पष्ट झाल्यामुळे फेडकडून एक टक्का दरवाढ केली जाण्याच्या शक्यता व्यक्त होत होत्या. तसे झाल्यास पुन्हा एकदा भारतासह आशियातील शेअर बाजारात गडगडाट होऊ शकतो, अशा भीतीचे सावट निर्माण झाले होते. अखेरीस फेडरल रिझर्व्हच्या बैठकीत 0.75 टक्के दरवाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
खरे म्हणजे ही व्याजदरवाढही रुढार्थाने भारतीय बाजारांसाठी सकारात्मक नाहीये. परंतु तरीही गेल्या तीन दिवसांमध्ये भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी दिसून आली. असे का घडले? याला काही कारणे आहेत. एक म्हणजे फेडरल रिझर्व्हकडून ही व्याजदरवाढ करताना एकंदरीत अमेरिकन अर्थव्यवस्थेबाबत एक आशावाद व्यक्त करण्यात आला. मध्यंतरीच्या काळात भारतीय शेअर बाजाराबरोबर किंबहुना त्याहून अधिक प्रमाणात अमेरिकन शेअर बाजारात घसरण झाली होती. डाऊ आणि नॅसडॅक, एस अँड पी यांमध्ये 4 टक्क्यांपर्यंत घसरण पाहायला मिळाली होती. त्यांवरून अमेरिकन अर्थव्यवस्थेला लवकरच एका मंदीच्या फेऱ्याला सामोरे जावे लागू शकते, अशी चिंता व्यक्त केली जात होती. फेडच्या बैठकीनंतर या शक्यतांची भीती दूर झाली आणि सर्वांनीच एक प्रकारे सुटकेचा निःश्वास टाकला.
खरे पाहता भारतीय शेअर बाजारातील बड्या गुंतवणूकदारांनी-संस्थांनी फेडकडून एक टक्का दरवाढ होणार नाही ही खूणगाठ आधीच बांधली होती. अन्यथा, फेडच्या बैठकीपूर्वी बाजारात नेहमीच घसरण पाहायला मिळते. यंदा ती दिसून आली नाही. उलट बाजारात चढती भाजणीच दिसली होती. फेडच्या निर्णयानंतर या तेजीला आणखी बळकटी मिळाली. दुसरे कारण म्हणजे एफआयआयचा विक्रीचा मारा कमी होऊन खरेदीकडे वळलेला मोर्चा. 27 आणि 28 जुलै रोजी एफआयकडून सुमारे 5 हजार कोटींचे स्टॉक फ्युचर्स खरेदी करण्यात आले. 28 जुलै रोजी 1637 कोटींच्या समभागांची खरेदी करण्यात आली. याचा परिणाम म्हणजे शुक्रवारी सप्ताह समाप्तीच्या वेळी भारतीय शेअर बाजारातून निफ्टी 17 हजारांचा टप्पा पार करत 17,158 वर बंद झाला; तर सेन्सेक्स 57,570 अंकांवर विसावला.
या तेजीला आणखी दोन प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे अलीकडेच “ब्लूमबर्ग’ने जगभरातील अर्थतज्ज्ञांकडून एक सर्वेक्षण केले असून त्यामध्ये विविध देशांमध्ये मंदीची शक्यता किती आहे याचे अवलोकन करण्यात आले आहे.
या सर्वेक्षणानुसार भारतात मंदीची शक्यता नसल्याचे दिसून आले आहे. हे वृत्त शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचा उत्साह द्विगुणित करणारे ठरले आणि मध्यंतरीच्या काळात बाजारात गुंतवणूक करावी की नाही, याबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यास यामुळे हातभार लागला. दुसरे कारण म्हणजे चालू आर्थिक वर्षातील विविध कंपन्यांचे दमदार तिमाही निकाल. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी, आयसीआयसीआय बॅंक, कोटक महिंद्रा बॅंक यांसारख्या कंपन्यांच्या तिमाही निकालांमधून नफ्यामध्ये घसघशीत वाढ झाल्याचे दिसून आल्याने या प्रमुख कंपन्यांचे समभाग जबरदस्त वधारले आणि बाजाराने उसळी घेतली. याशिवाय ज्या महागाईच्या आव्हानामुळे बाजारावर नकारात्मक छाया पसरली होती त्यादृष्टीनेही काही सकारात्मक घडामोडी घडत गेल्या. मुख्य म्हणजे कच्च्या तेलाचे भाव शंभर डॉलर्सच्या खाली आले आहेत. यांसह विविध कमोडीटींचे भावही घसरले आहेत. मान्सूनने सर्वदूर दमदार हजेरी लावली आहे. येत्या काळात उत्सवाचा काळ सुरू होत आहे. या सर्व सकारात्मक संकेतांमुळे शेअर बाजाराने तेजीचा मार्ग पत्करत जोमाने वाटचाल सुरू केली आहे. लवकरच निफ्टी 17,700 पर्यंत झेपावू शकतो.
भारतीय शेअर बाजारात दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक केल्यास निश्चितपणाने चांगला परतावा मिळतो, हे पुन्हा एकदा यानिमित्ताने स्पष्ट होताना दिसत आहे.