“छोटा गंधर्व’ तसेच “सौदागर’ म्हणूनही ओळखले जाणारे मराठी रंगभूमीवरील नामवंत गायक नट, सौदागर नागनाथ गोरे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कोरेगाव जवळच्या भाडळे या गावी 10 मार्च 1918 रोजी झाला. जन्मतःच त्यांना एक दात होता. ही गोष्ट खूप अशुभ मानली जायची. त्यामुळे सौदागरांच्या मामाने त्यावेळच्या कुर्तकोटी शंकराचार्यांना याबाबत विचारले.
शंकराचार्यांनी सांगितले की हा मुलगा मोठेपणी खूप नाव कमावणार आहे. सौदागरांना गोड आवाजाची निसर्गदत्त देणगी मिळाली होती. त्यांचे कोरेगाव येथे तिसरीपर्यंतच शिक्षण झाले. त्यावेळी शाळेत कुणी पाहुणे येणार असतील तर स्वागतपद्य सौदागरच म्हणत असत. एकदा शाळेला भेट द्यायला आलेल्या “बालमोहन संगीत मंडळी’चे मालक दामूअण्णा जोशी यांनी सौदागरांचा आवाज ऐकला. त्यानंतर त्यांनी सौदागरांचे वडील नागनाथ गोरे यांच्याकडे या मुलाची मागणी केली.
सौदागर आणि धाकटा भाऊ पितांबर यांना घेऊन दामूअण्णा पुण्याला आले. त्यांनी सौदागरांच्या संगीत शिक्षणाची व्यवस्था केली. त्यांना बळवंत गोवित्रीकर, दत्तूबुवा बागलकोटकर, नरहरबुवा पाटणकर, गणेशबुवा पाध्ये यांच्याकडून गायनाचे शिक्षण मिळाले. ते टप्पा आणि ठुमरी गायनातही पारंगत झाले. वर्ष 1939 मध्ये लाहोरचे ग्वाल्हेर घराण्याचे गायक सेंदेखॉं यांच्याकडे व वर्ष 1944-45 साली ते कोल्हापूरला असताना भूर्जीखॉं यांच्याकडे गाणे शिकले. त्यामुळे त्यांच्यावर अनेक शैलीतील गायकाच्या तालमीमुळे त्यांचे गायन अधिकच समृद्ध झाले.
“प्राणप्रतिष्ठा’ या नाटकाद्वारे 10 वर्षे वयाच्या सौदागरांनी मराठी नाट्यसंगीत क्षेत्रात प्रवेश केला. त्यांच्या आवाजामुळे दामूअण्णांनी नाट्यप्रयोगांच्या जाहिरातींत सौदागरांचा उल्लेख “छोटा गंधर्व’ असा करण्यास सुरुवात केली. सुमारे 20 वर्षे त्यांनी संगीत रंगभूमीची अनेक नाटकांतून सेवा केली.
वर्ष 1932-33 च्या सुमारास मराठी रंगभूमीला अडचणींचा काळ आला व बालमोहन संगीत मंडळीलाही त्याचा परिणाम जाणवू लागला. त्यावेळी आचार्य अत्रे या संस्थेच्या मागे उभे राहिल्यामुळे ही संस्था त्या आपत्तीतून बचावली. अत्र्यांचे पहिले नाटक “साष्टांग नमस्कार’ बालमोहनने 1933 साली रंगभूमीवर आणले. यामध्ये सौदागरांनी नायिकेची-त्रिपुरीची भूमिका केली. त्यानंतर त्यांनी स्त्रीभूमिका करणे सोडून देऊन नायकाच्या भूमिका करावयास आरंभ केला.
आचार्य अत्रे चित्रपट वृत्तपत्र व अन्य क्षेत्रांत मग्न झाल्यामुळे “बालमोहन’चा एक आधार तुटला त्यामुळे सौदागर यांच्यासह “बालमोहन’मधल्या काही प्रमुख नटांनी 1943 मध्ये “कला-विकास’ ही नवी संस्था काढली. सौदागर या संस्थेचे प्रमुख अर्ध्वयू होते. त्यांनी संस्थेच्या “देवमाणूस’ या नाटकापासून नाट्यगीते लिहिण्यास सुरुवात केली व गीतकार हा त्यांचा आणखी एक पैलू रसिकांचे समोर आला. सुमारे 20 नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या त्यामध्ये सुमारे 6 स्त्री भूमिका तर 14 पुरुष भूमिका केल्या. सुमारे 20 पदे त्यांनी स्वतः गायली.
वयोमानानुसार आपल्या आवाजातील कमजोरपणा त्यांच्या लक्षात आल्यावर, वर्ष 1978 मध्ये नाट्यसंन्यास स्वीकारला. वर्ष 1984 मध्ये,त्यांच्या रंगभूमीचा वारसा चालविण्यासाठी पदार्पण करण्याची तयारी करीत असतानाच त्यांना शिवप्रसाद या त्यांच्या एकुलत्या मुलाच्या अपघाती निधनाचा धक्का बसला. तरीही संगीताच्या साथीने पुढची पिढी घडवण्याचे सौदागरांचे कार्य चालू होते. 31 डिसेंबर 1997 रोजी छोट्या गंधर्व यांचे निधन झाले.