– ह.भ.प. संतोष महाराज शास्त्री
भावेवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति । बळेवीण शक्ती बोलूं नये।।
हरिपाठाच्या चौथ्या अभंगात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, जन्ममृत्युरूपी संसारदुःखापासून एक हरीच सोडविणारा आहे, असा भाव (विश्वास) असल्याशिवाय हरीची भक्ती म्हणजे हरीवर आत्यंतिक प्रेम बसणार नाही व अशा आत्यंतिक भक्तीवाचून संसारातून मुक्तता केव्हाही होणार नाही, असा नियम आहे.
याप्रमाणे हरीच्या, भगवंताच्या ठिकाणी भाव असल्यावाचून भक्ती होईल व भक्तीवाचून मुक्ती मिळेल असे जे म्हणतात, त्यांचे ते म्हणणे आपल्या अंगात काही एक बळ नसताना मी अमुक एक शक्तीची गोष्ट करीन असे म्हणण्याप्रमाणे व्यर्थ होय.
म्हणून तसे बोलू नये. देह, स्त्री, पुत्र, गृह, धन, यांच्या प्राप्तीविषयी व रक्षणाविषयी प्रापंचिक खटाटोप तुम्ही रात्रंदिवस करीत असता व हरीचे भजन मात्र अजिबात करत नाहीत असे का? माऊली म्हणतात, हरीचे भजन केल्याने जन्ममरणरूप संसारातून तुमची सुटका होईल.