अशुद्ध मुद्रण म्हणजे राष्ट्राची हानी
पुणे, ता. 21 – “देशामध्ये अशुद्ध पुस्तके निर्माण झाली तर ती एक राष्ट्रीय हानी आहे. कारण अशुद्ध पुस्तके वाचणारी पिढी ही अज्ञानीच राहणार. यासाठी सरकारकडे दाद लावून घेऊन अशा मुद्रणपद्धतीला पायबंद घातला पाहिजे. मुद्रित शोधक मंडळ जे शिक्षण देत आहे ते महत्त्वाचे आहे. मुंबई सरकारच काय पण केंद्र सरकारनेही मंडळाच्या कार्याचे महत्त्व ध्यानी घेऊन आपल्या मदतीचा हात द्यावा, तरच मंडळ अभ्यासक्रम योजनाबद्ध रीतीने तयार करून त्याचा प्रसार करू शकेल’, असे उद्गार महामहोपाध्याय द. वा. पोतदार यांनी काढले.
ते म्हणाले, भाषा ही प्रवाही असते. तिचे संगोपन मुलाप्रमाणे केले पाहिजे. तिला जसे स्वातंत्र्य दिले पाहिजे तसे तिच्यावर जरूरीपुरते नियंत्रणही ठेवले पाहिजे. ग्रंथांची शुद्धता राखण्यात लेखक आणि मुद्रक यात मुद्रितशोधक हा महत्त्वाचा मध्यस्थ आहे.
भारत-पाक व्यापारी करार
नवी दिल्ली – उभय राष्ट्रांचे दरम्यान व्यापारवृद्धी करण्यासाठी आज येथे भारत-पाक व्यापारी करार करण्यात आला. या कराराची मुदत दोन वर्षाची आहे. भारत पाकिस्तानला कोळसा, दगड पुरविणार असून पाक भारताला कच्चा ताग पुरविणार आहे.
अरब प्रजासत्ताकाकडून भारत तांदूळ घेणार
नवी दिल्ली- संयुक्त अरब प्रजासत्ताकाकडून 100 हजार टन तांदूळ खरेदी करण्याबाबत भारताने आज करार केला आहे. या तांदळाचा पुरवठा एप्रिलपासून चालू होऊन जूनमध्ये संपेल. या विक्रीच्या रकमेतून अरब प्रजासत्ताक भारतातून ताग, चहा वगैरे वस्तू खरेदी करणार आहे.
श्री. सेनानायके सीलोनचे पंतप्रधान
कोलंबो – सीलोनचे नवे पंतप्रधान म्हणून संयुक्त पक्षाचे नेते डडले सेनानायके यांचा आज शपथविधी झाला. सीलोनमध्ये भारतीय नागरिकांचा प्रश्न सोडविण्यासाठी नेहरू-कोटेलवाला करार अंमलात आणण्याचा प्रयत्न करीन असे सेनानायके म्हणाले.