“लोक माझ्याबद्दल किंवा मी कोणते कपडे परिधान करतो, याबद्दल काय बोलतात यामुळं मला अजिबात फरक पडत नाही. मला जे कपडे आवडतात ते मी घालतो. मला जे खायला आवडतं ते मी खातो. जर ही गोष्ट कुणाला आवडत नसेल तर त्याच्यासाठी मी काहीही करू शकत नाही,” असं एका मुलाखतीतून ट्रोल्सना थेट सुनावणाऱ्या प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंहने त्याच्या “आवडी’चा पुढचा टप्पा गाठला आणि सगळ्यांनी तोंडात बोटं घातली.
कारण “आवडते’ कपडेसुद्धा एके दिवशी त्याला टोचू लागतील, असं कुणालाच वाटलं नव्हतं. तसं पाहायला गेलं तर कपड्यांचाच कंटाळा आलाय, असं म्हणणारा आणि त्याबरहुकूम वागणारा रणवीर हा काही पहिलाच अभिनेता नव्हे. त्यानं “न्यूड फोटोशूट’ केल्यानंतर अनेकांना पूर्वीचे किस्से आठवू लागले.
गळ्यात अजगर घेऊन फिरणारा मिलिंद सोमण, “पीके’मधला आमीर खान, अमिषा पटेलचा भाऊ अश्मित पटेल, टीना दत्तबरोबर बोल्ड फोटोशूट करणारा अंकित भाटिया यांच्यासह विद्युत जामवाल, जॉन अब्राहम, राहुल खन्ना अशी असंख्य नावं पुढे आली. थोडक्यात “रणवीर एकटा नाही’ हे सांगण्याची चढाओढ लागली. नावं ठेवणारे, ट्रोल करणारे, मीम्स बनवून पसरवणारे पूर्वीही होते, आताही आहेत आणि पुढेही राहतील; पण ज्याला जे करायचंय तो ते करणारच, असा एकंदरीत भाव (सॉरी “टोन’) बॉलीवूडमधल्या चर्चांमधून दिसून आला.
रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटचे पडसाद राजकारणात उमटले, पोलिसांत तक्रार झाली वगैरे सगळं ठीक आहे. पण त्याबद्दल पत्रकारांनी एका अभिनेत्रीला प्रश्न विचारला, तेव्हा ती भडकलीच. म्हणाली, “”रणवीर माझा आवडता अभिनेता आहे आणि त्याच्या विरोधात काहीही बोललेलं मला खपत नाही. त्याला जसं कम्फर्टेबल वाटेल, तसा तो राहील.” मनात विचार आला, तेही बरोबरच आहे; पण आपण इतरांच्याही कम्फर्टचा विचार करायला बांधील असतो की नाही? त्याला “तसं’ कम्फर्टेबल वाटतं म्हणून तो “तसाच’ फिरतो का? बरं, त्याचं फोटोशूट पाहून विष्णू विशाल नावाच्या दाक्षिणात्य अभिनेत्यानंही “तस्संच’ फोटोशूट करून घेतलं, ते कशासाठी? यापूर्वी ज्यांनी-ज्यांनी हे केलं, ते खरोखर कशासाठी? कम्फर्टेबल वाटतं म्हणून?
केवळ “मेरी मर्जी’ म्हणून? काय आहे यामागे? आवड, छंद की विकृती? यापलीकडे खरंच काही नाहीये का? या अशा फोटोशूटमागील अर्थकारणाचं काय? “”मला हवं त्या मार्गानं मी खच्चून पैसे आणि प्रसिद्धी मिळवणार, मला अडवणारे तुम्ही कोण?” या मानसिकतेला काय नाव द्यायचं? यापूर्वी रणवीर ट्रोल झाला म्हणून चर्चा झाली, मग बॉलीवूडकरांनी त्याला पाठिंबा दिला म्हणून चर्चा झाली, आता पोलिसांत तक्रार झालीये म्हणून चर्चा होणार!
इंडियाचे प्रॉब्लेम्स किती वेगळे आहेत ना! भारतीय उगीचच गॅसची दरवाढ, जीवनावश्यक वस्तूंवर लावलेला जीएसटी, बेरोजगारी, रुपयाचं अवमूल्यन, पुरामुळं झालेलं नुकसान, शेतकऱ्यांची परिस्थिती वगैरे विषयांवर बोलत असतात. “आम्ही कसं जगायचं ते सांगा,’ असं म्हणणारे एकीकडे आणि “आम्ही कसं जगायचं ते सांगू नका,’ असं म्हणणारे दुसरीकडे! दोघांमधली दरी इतकी वाढलीये, की इकडच्यांना तिकडचे आणि तिकडच्यांना इकडचे बिलकूल दिसेनासे झालेत. ज्यांना दोन्हीकडचे दिसताहेत ते महादुर्दैवी..!