त्या साखर कारखान्यांना बिनव्याजी कर्ज
मुंबई, दि. 31 – “आजारी’ सहकारी साखर कारखान्यांना ऊस खरेदीसाठी सूट देण्याबाबत 15 ते 20 दिवसांत निर्णय घेण्यात येईल. अशा आजारी साखर कारखान्यांना व्याजाशिवाय 5 वर्षांसाठी कर्ज पुरवठा करण्याची योजना विचाराधीन आहे, असे आज सहकार मंत्री शंकरराव पाटील यांनी विधानसभेत सांगितले. अशा कारखान्यांना करातून पूर्ण सूट देण्यास मात्र त्यांनी नकार दिला. राज्यात असे 13 आजारी साखर कारखाने आहेत. महाराष्ट्र राज्यात एकूण 2 लाखांवर शेतकऱ्यांना 9 कोटी 22 लाख रुपयांचे कर्जे दिले.
कृष्णेचे पाणी मद्रासला पुरविण्याबाबत बोलणी
मद्रास – कृष्णा नदीचे पाणी मद्रासला पुरविण्याबाबत तामीळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्र प्रदेश या चार राज्यांच्या प्रतिनिधींमध्ये दिल्ली येथे 14 एप्रिल रोजी वाटाघाटी होतील, असे आज राज्यपाल के. के. शाह यांनी सांगितले.
नवी विद्यापीठे
नवी दिल्ली – “राष्ट्रीय जनता विद्यापीठ’ हे “खुले विद्यापीठ’ सुरू करण्याचा व पॉंडिचेरी येथे एक केंद्रीय विद्यापीठ काढण्याचा सरकार विचार करीत आहे. त्याचप्रमाणे 7 नवी विद्यापीठे काढण्याचा प्रश्न विद्यापीठ अनुदान मंडळाकडे विचाराधीन आहे.