दुसऱ्याच्या सांगण्यावरून भारत धोरण ठरवत नाही
जम्मू, दि. 28 – दुसऱ्यांच्या सांगण्यावरून भारत आपले धोरण ठरवीत नाही. मग त्या सत्ता कितीही मोठ्या असोत, असे उद्गार पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी काढले. त्या पुढे म्हणाल्या, देशाचे आणि जनतेचे हित लक्षात घेऊनच आमची धोरणे ठरविली जातील. मी परदेशात दोऱ्यावर असताना एका बड्या देशाच्या नेत्याने मला सांगितले की, तुम्ही आमच्या धोरणाला मान्यता देत नसल्याने आम्ही तुम्हाला मदत देत नाही. तेव्हा मी उत्तर दिले की, अटी असलेली मदत आम्हाला नको आहे.
आगरवाल समाज हुंडा घेणार नाही
पुणे – यापुढे आगरवाल समाज हुंडा पद्धत नष्ट करण्यासाठी मुलाच्या लग्नात हुंडा घेणार नाही. समाजातील कुणासही घेऊ दिला जाणार नाही, अशी प्रतिज्ञा खडकी येथे भरलेल्या आगरवाल समाजाच्या संमेलनात घेण्यात आली.
निवडक क्षेत्रांतच विदेशी गुंतवणुकीस परवानगी
नवी दिल्ली – ज्या क्षेत्रांतून भरपूर निर्यात होते तसेच जेथे सहकार्यामुळे देशी तंत्रज्ञानाचा विकास होण्याची शक्यता आहे अशा क्षेत्रांतच विदेशी गुंतवणुकीस सरकार संमती देईल, असे अर्थमंत्री सुब्रह्मण्यम यांनी सांगितले.