पुणे, दि. 11 – आज 12 जुलै आहे. 12 जुलै 1961 रोजी पानशेत आणि त्याच्या पाठोपाठ खडकवासला धरण फुटले आणि पुणे शहारात हाहाकार झाला. नदीकाठची आणि आजूबाजूची लोकवस्ती भुईसपाट झाली. होत्याचे नव्हते झाले. किती तरी लोकांचे सर्वस्व गेले! हजारो लोक बेघर झाले. इतक्या वर्षांनंतरही पानशेतच्या पुराच्या खुणा शहरात दिसतात.
पानशेत पूरग्रस्ताचे संपूर्ण पुनर्वसन करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते; पण हजारो लोकांचे इतक्या वर्षांनंतरही पुनर्वसन झाले नाही. आता होईल ही शक्यता उरलेली नाही. काही हाउसिंग सोसायट्या तयार झाल्या. पण आजतागायत त्यांची बांधकामे झालेली नाहीत. पानशेतच्या प्रचंड लोंढ्याचे नदीचा काठ आणि पात्रही उद्ध्वस्त केले. अजूनही नदीच्या पात्रात पडलेले दगड तसेच आहेत. नदी सुधारणेचा काही विचारच झाला नसावा असे दिसते.
शहराच्या मधून वाहणारी नदी हे शहराचे वैभव असते. पण पुणे शहरातील नदीची आजची दशा पाहिल्यानंतर आणि पात्रांची दुर्दशा पाहिल्यानंतर ही नदी म्हणजे अडचणच ठरण्याचा धोका आहे. पुरानंतर काही दिवसांनी पुनर्वसनासाठी पर्वतीदर्शन, शिवदर्शन, गणेशवाडी, जनवाडी, गोखले नगर यासारख्या वसाहती महाराष्ट्र सरकारने उभारल्या, तर लक्ष्मीनगर, महर्षिनगर यासारख्या वसाहती हाउसिंग बोर्डाने उभारल्या.
आजही पुराची आठवण तीव्र राहते याचे कारण तो प्रसंग तसा आयुष्यात कधी न विसरावा असा होता. पण याच बरोबर माणसांना दैनंदिन जीवनातही आपण पूरग्रस्त आहोत हे जाणवत राहाणे, पुनर्वसनाविषयींच्या शंका दूर होऊ नयेत, ही गोष्ट खटकते.