मूलभूत कर्तव्ये समाविष्ट केल्याने परिवर्तन होईल
नवी दिल्ली, दि. 5 – दुरुस्त घटनेत मूलभूत कर्तव्ये समाविष्ट केल्याने लोकांची वृत्ती व विचार पद्धती बदलेल. त्याचा उपयोग शांततापूर्ण परिवर्तनासाठी होईल, असे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सांगितले. अनेक राष्ट्रांच्या घटनेत कर्तव्याचा समावेश आहे, पण आपल्या घटनेत फक्त लोकांच्या हक्कांचा समावेश आहे.
महात्मा गांधी नेहमी म्हणत की हक्काबरोबर कर्तव्ये असतात. आता कर्तव्ये ठरविण्यात आली असून ती घटनेत समाविष्ट केली जातील. काही लोक विचारतात, कर्तव्यांचा घटनेत समावेश करून बदल कसा होणार? हे खरे आहे. ती कर्तव्ये बदल करणार नाहीत. पण कर्तव्ये मनात ठेवली तर लोकांच्या प्रवृत्तीत बदल होईल.
जुन्या ‘न्यायपंचायती’चे पुनरुज्जीवन करावे
बंगलोर – ग्रामीण भागातील गोरगरिबांना झटपट आणि स्वस्तात न्याय मिळावा यासाठी पूर्वीच्या न्यायपंचायतीचे पुनरुज्जीवन करावे, असे
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. एन. भगवती म्हणाले. भगवती यांनी एक कार्यक्रमाच्या प्रसंगी सांगितले की, राज्य सरकारांनी ग्रामीण भागात लोकन्यायालये स्थापन करावीत.
हिमालयाच्या पूर्व-पश्चिमेस तेलाची अधिक शक्यता
नवी दिल्ली – हिमालयाच्या पायथ्यानजिक अथवा त्या विभागापेक्षा हिमालयाच्या पश्चिम व पूर्वेकडील भागात तेल व नैसर्गिक वायू मिळण्याची शक्यता अधिक असण्याचे पाहणीत आढळून आले. तेल व नैसर्गिक वायू मंडळाने ही पाहणी केली.