मंत्री व अधिकारी यांनी निर्णय लवकर घ्यावेत
मुंबई, दि. 14 – मंत्री व सरकारी अधिकारी यांनी सार्वजनिक महत्त्वाच्या प्रश्नात चुका होतील ही भीती बाळगून दिरंगाई न करता आपल्या कायदेशीर अधिकारांचा वापर करून हे प्रश्न त्वरेने सोडविले पाहिजेत, असे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण म्हणाले.
जे अधिकारी जलद निर्णय घेऊ शकत नसतील ते कर्तव्यात कसूर करीत आहेत, असा आरोप करण्यास पात्र आहेत. चुका प्रामाणिक असतील तर मी क्षमा करायला तयार आहे. सचिवालयात “डेस्क अधिकारी’ पद्धत आपण सुरू केल्याने आता फाइली त्वरेने पुढे सरकतात, असेही चव्हाण म्हणाले.
विनातिकीट बस उतारूंना दंड करण्याची तरतूद
पुणे – स्टेट ट्रान्सपोर्ट बसेसमधून प्रवास करणाऱ्या विनातिकीट प्रवाशांना शिक्षा करण्यासाठी नियमात दुरुस्ती करण्यात येणार आहे. नियमात दुरुस्ती केल्यानंतर विनातिकीट उतारूस दंड म्हणून तिकिटाच्या दुप्पट पैसे भरावे लागतील, असे वाहतूक मंत्री कस्तुरे यांनी सांगितले.
कस्तुरे पुढे म्हणाले, विनातिकीट प्रवासी येणाऱ्या गाडीतील कंडक्टरला निलंबित करण्यात येईल. कस्तुरे पुढे म्हणाले, यापुढे जो फायदा होईल त्यातून आणखी नव्या बसेस घेण्यात येतील. येत्या मार्चपासून 7500 बसेसच्या तांड्यात एक हजार बसेसची नव्याने भर पडणार आहे.