-प्रकाश पी. गद्रे
प्रभू येशू मानवाला उद्धाराचा व प्रीतीचा संदेश देण्यासाठी मानवामध्ये प्रगट झाले व मानवाला शांतीचा संदेश दिला. त्यांनी दाखवलेल्या शांततेच्या मार्गावरून मानवाला चालायचे आहे.
येशू ख्रिस्तांच्या जन्मदिवशी संपूर्ण जगतामध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण तयार होते. कारण येशूंचा जन्म हा मानव कल्याणासाठी, जगात शांतता नांदावी यासाठी आहे. येशू ख्रिस्ताचा जन्म ही मानवी इतिहास बदलून टाकणारी घटना आहे. पुष्कळशा इतिहासाच्या पुस्तकात येशूंच्या जन्माविषयीची नोंद असते. परंतु योग्य प्रकारची माहिती हवी असेल तर पवित्र शास्त्र जे ख्रिस्ती लोकांचे धर्मग्रंथ म्हणून ओळखले जाते ते वाचले पाहिजे.
पवित्र शास्त्रामध्ये प्रामुख्याने दोन महत्त्वाचे भाग पाडलेले आहेत. जुना करार व नवा करार. दोन्ही भागांमध्ये प्रभू येशूंच्या जन्माचा उल्लेख आढळतो. नव्या करारामध्ये सविस्तर वृत्तांत प्रामुख्याने मत्तय व लूक या पवित्र शास्त्रातील पुस्तकांमध्ये पाहावयास मिळतो. त्यामध्ये मरिया नामक एक कुमारी यहुदीयाच्या गालीलातील, नासरेथ नामक नगरात राहात होती. परमेश्वराने या कुमारीकेकडे गॅब्रिएल नामक देवदूताला पाठविले. देवदूत तिला म्हणाला, हे कृपा पावलेले “कल्याण’ प्रभू तुजबरोबर असो, “स्त्रियांमध्ये तू धन्य आहेस’, मरिया हे ऐकून फारच घाबरली आणि हे अभिनंदन कशासाठी असेल, असा विचार करू लागली.
देवदूताने तिला म्हटले, “मरिये, भिऊ नको, कारण देवाची कृपा तुजवर झाली आहे. पाहा, तू गरोदर होशील व पुत्र प्रसवशील, त्याचे नाव “येशू’ ठेव. तो थोर होईल. तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुगे राज्य करील. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.’ मरियेने देवदूताला म्हटले, “हे कसे होईल” कारण मला पुरुष ठाऊक नाही’. देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुजवर येईल आणि परात्वराची शक्ती तुजवर छाया करील, याकरीता जो जन्मेल, त्याला पवित्र देवाचा पुत्र, असे म्हणतील. देवाचे कोणतेही वचन असमर्थ होणार नाही’. तेव्हा मरिया म्हणाली, “पाहा, तुझ्या वचनाप्रमाणेच होवो.’ मग देवदूत तिजपासून निघून गेला.
महत्त्वाचा मुद्दा, या सर्व संदर्भामध्ये हा आहे की, येशूंच्या जन्माआधीच, त्यांचे नाव ठरविण्यात आले होते. “येशू’ या नावाचा अर्थ नेमका काय आहे, हे पवित्र शास्त्रातील दुसऱ्या एका संदर्भामध्ये आढळते. मरिया हिचे योसेफ नावाच्या यहुदी पुरुषाबरोबर वाग्दान (लग्नासंबंधी ठराव) झाल्यावर, त्यांचा सहवास होण्यापूर्वी, ती पवित्र आत्म्यापासून गरोदर झालेली, अशी दिसण्यात आली होती.
प्रभूच्या दूताने योसेफला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, “योसेफ दाविदाच्या पुत्रा, तू आपली स्त्री मरिया हिचा स्वीकार करावयास भिऊ नको. कारण तिच्या ठायी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. मरिया पुत्र प्रसवेल आणि तू त्याचे नाव “येशू’ ठेव. कारण तोच आपल्या लोकांस त्यांच्या पापांपासून तारील’. हे सर्व यासाठी झाले की, प्रभूने जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे की, “पाहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याला “इम्मानुएल” म्हणतील. या नावाचा अर्थ, “आम्हाबरोबर देव’ असा आहे. तेव्हा झोपेतून उठल्यावर योसेफने त्याला प्रभूच्या दूताने आज्ञा दिल्याप्रमाणे केले. त्याने आपल्या स्त्रीचा स्वीकार केला. तरी ती पुत्र प्रसवेपर्यंत त्याची व तिची ओळख नव्हती. त्याने त्याचे नाव “येशू’ असे ठेविले.
त्या दिवसात असे झाले की, सर्व जगाची नावनिशी (जनगणना) लिहावी, अशी कैसर औगुस्त याची आज्ञा झाली. क्वीरीनिय हा सुरिया प्रांताचा सुभेदार असता ही पहिली नावनिशी झाली. तेव्हा सर्व लोक आपापल्या गावी नावनिशी लिहून द्यावयास गेले. योसेफही आपल्यास वाग्दत्त झालेली मरिया गरोदर असता तिजसहित नावनिशी लिहून द्यावयास, गालीलातील नासरेथ, गावाहून यहुदीयातील “बेथलहेम’ नामे दाविदाच्या गावात निघून गेला, कारण तो दाविदाच्या घराण्यातला व गोत्रातला होता.
मरिया तिथे असता, असे झाले की, तिचे प्रसूतीचे दिवस भरले आणि ती आपला पुत्र (प्रभू येशू) प्रसवली, त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत (गाईचा गोठा) निजविले, कारण त्यांस उतारशाळेत व इतरत्र कोठेही जागा नव्हती. त्याच प्रांतात मेंढपाळ रानात राहून, रात्री आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्यासमोर उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्याभोवती प्रकाशले. देवदूत त्यास म्हणाला, “भिऊ नका, कारण पाहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे, त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो. ती ही की, तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे.’
खरोखरच प्रभू येशूंच्या जन्मामुळे संपूर्ण जगामध्ये एक मोठा आनंद होत असतो. कारण तो मनुष्यांमध्ये “तारणारा’ शांती देणारा म्हणून जन्मास आला. पवित्र शास्त्र सांगते, हाच प्रभू येशू आमच्या अपराधांमुळे, दुष्कर्मामुळे घायाळ झाला. त्याने वधस्तंभावर आम्हा सर्वांसाठी आपला प्राण दिला. येशूला मरण आले, त्यांना पुरण्यात आले, परंतु तिसऱ्या दिवशी ते कबरेतून जिवंत बाहेर आले. शिष्यांना त्यांनी दर्शन दिले व पुन्हा स्वर्गात गेले. पवित्र शास्त्र सांगते की, हाच प्रभू पुन्हा भूतलावर न्याय करण्यासाठी येणार आहे. त्याच्या जन्मामुळे संपूर्ण जगताला आनंदाचा संदेश दिला गेला.