भारताचे पहिले सायकलपटू व ज्येष्ठ चित्रपट अभिनेते जानकीदास मेहरा यांचा आज स्मृतिदिन. जानकीदास यांचा जन्म 1 जानेवारी 1910 रोजी पाकिस्तानातील लाहोर येथे झाला. फार थोड्या लोकांना माहिती आहे की, जानकीदास मेहरा हे चित्रपटातील एक अभिनेते म्हणून प्रसिद्ध असले तरी भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय सायकलपटू होते. बॉलीवूडचे पहिले प्रॉडक्शन डिझायनर म्हणूनही त्यांचे नाव घेतले जाते. “पत्थर और पायल’ आणि “वारंट’ हे त्यांनी प्रॉडक्शन डिझाइन केलेले पहिले चित्रपट. जानकीदास हे पटकथा संवादलेखकदेखील होते. त्यांनी सन 1955 मध्ये यादों की काम या चित्रपटाचे संवाद लिहिले होते.
त्यांनी त्यांच्या अनुभवातून चित्रपट निर्मिती आणि अभिनय याबद्दल पुस्तकेही लिहिली. “माय ऍडव्हेंचर्स इन फिल्मलॅंड’ आणि “ऍक्टिंग फॉर बिगिनर्स’ ही त्यांची सर्वात प्रसिद्ध पुस्तके. भारताच्या पहिल्या ऑलिम्पिक सायकलपटूपासून ते प्रख्यात अभिनेता, दिग्दर्शक, कार्यकर्ता, विनोदकार आणि लेखक, प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तृत्वाचं ठसा उमटविला.
त्यांनी चंदेरीदुनियेत प्रवेश करण्यापूर्वी राष्ट्रकुल व ऑलिम्पिक स्पर्धेत भारतातील पहिला सायकलपटू म्हणून ओळख निर्माण केली. तेव्हा भारतात सायकलचा वापर नुकताच सुरू झाला होता, त्याला क्रीडास्वरूप मिळाले नव्हते. वर्ष 1934 ते 1942 या 8 वर्षांच्या कालखंडात त्यांनी अनेक सायकल स्पर्धांतून भाग घेतला. वर्ष 1938 मध्ये सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या ब्रिटिश एम्पायर गेम्स (राष्ट्रकुल स्पर्धा) आणि 1940 मध्ये टोकियो येथील इस्टर्न गेम्समध्ये ते भारताचे एकमेव प्रतिनिधी होते. विशेष म्हणजे हिटलर राष्ट्रप्रमुख असताना “बर्लिन ऑलिंपिक’ वर्ष 1936 मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे नेतृत्व करणाऱ्या पॅनेलचे ते एकमेव भारतीय सदस्य होते. मात्र, वर्ष 1942 मध्ये झुरिच येथे झालेल्या वर्ल्ड स्पोर्टस कॉंग्रेसमध्ये महात्मा गांधी यांनी त्यांना ब्रिटिश भारतीय संघाकडून खेळण्यापासून परावृत्त केले. त्यानंतर जानकीदास स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले.
नंतर वर्ष 1946 मध्ये त्यांनी जागतिक क्रीडा कॉंग्रेसमध्ये भारताचा स्वातंत्र्यपूर्व राष्ट्रीय ध्वज फडकावला. वर्ष 1946 मध्ये जानकीदास मेहरा यांनी आणखी एक सायकलिंग दिग्गज सोहराब भुतने यांच्या साथीने “नॅशनल सायकलिस्ट फेडरेशन ऑफ इंडिया’ची स्थापना केली. या महासंघाने ऑलिम्पिक, आशियाई खेळ आणि इतर सर्व प्रमुख सायकलिंग स्पर्धांसाठी सायकलपटूंचे संघ पाठवले.
दरम्यान ते चित्रपटसृष्टीकडे वळले. वर्ष 1941 मधील खजांची हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर पाच वर्षांनी वर्ष 1946 मध्ये डॉ. कोटणीस कि अमर कहाणी या व्ही. शांताराम निर्मित सिनेमात डॉ. मुखर्जी यांचे काम केलं होते. वर्ष 1998 मध्ये त्यांनी अखेरचा चित्रपट “घर बझार’मध्ये काम केले. त्यावेळी निळू फुलेही त्यांच्या बरोबर होते.
वर्ष 1996 मध्ये इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशनतर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच फिल्म रायटर्स असोसिएशननेही त्यांचा त्याच वर्षी गौरव केला होता. सिने आर्टिस्ट असोसिएशनने वर्ष 1907 मध्ये जानकीदास यांचा शाल आणि चांदीची ट्रॉफी देऊन गौरव केला होता. 18 जून 2003 रोजी त्यांचे निधन झाले.