नुकतेच 1 नोव्हेंबर 2022 रोजी अमेरिकन एलिसन फ्ल्युक-इरेन हिला 20 वर्षांची शिक्षा सुनावली गेली. ती इसीससाठी सीरियामध्ये महिला दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत होती. तसेच अनेक गुन्हे न्यायालयात सिद्ध झाल्याने तिला शिक्षा ठोठावली गेली.
एलिसन ही आयएसआयएसच्या महिला बटालियनची प्रमुख होती. तिने एके-47 रायफल आणि सुसाइड बेल्ट वापराचे प्रशिक्षण अनेक स्त्रियांना दिले होते. विशेषतः खातीबा नुसायबाह या महिला पथकाला तिने प्रशिक्षण दिले. अनेक मुलींचे ब्रेन वॉश करून त्यांना दहशतवादी बनवले होते. सीरियातील दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी तिने अनेकांना तिथे पाठवले. इतकेच नाही तर तिने तिच्या मुलीचा लेयला इरेनचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी एका इसिसच्या दहशतवाद्याशी लावून दिला. त्याने तिच्यावर अत्याचार केले. मुलीची इच्छा नसताना सक्तीने हा विवाह गेला गेला. तिने तिच्या स्वत:च्या अपत्यांनासुद्धा छळल्याचा आरोप तिच्या मुलांनी केला आहे.
कान्सास विद्यापीठात ती शिकत होती. पुढे तिने इजिप्त, लिबिया आणि शेवटी सीरियात प्रवेश मिळवला. तिने दहशतवादी प्रशिक्षण सीरियात घेतले. तिने इसिसचा प्रमुख अबू बक्र अल-बगदादी याला एक योजना सादर केली होती. त्यात अमेरिकेतील महाविद्यालयात स्फोट घडवून आणण्याचा प्रस्ताव होता. तिने उम मोहंमद अल-अमरिकी या नावाने मोसुल- इराक येथे वास्तव्य केले. त्यावेळी या प्रदेशांवर इसिसचा पूर्ण ताबा होता. कारबॉम्बचा स्फोट घडवून आणण्यासाठी मोबाइलचा डिटोनेटर म्हणून वापर करणे हेसुद्धा तिने एका योजनेत सुचवले होते. पण तिच्या पतीने आक्षेप घेतल्याने ही योजना अंमलात आणली गेली नाही.
तिने पाच वेळा विवाह केल्याची नोंद आहे. तिचा तिसरा पती बांगलादेशी होता. तो इसिससाठी ड्रोन बनवत होता. त्याने हवेतून रासायनिक बॉम्ब टाकण्यासाठी ड्रोन विकसित केले होते. 28 जानेवारी 2022 रोजी तिला अमेरिकेने ताब्यात घेतले आणि आता खटला चालवून 20 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा दिली गेली. एखादी महिला अशा विध्वंसक कृत्यात कशी सामील होते याविषयी अनेकांना आश्चर्य वाटते. पण दहशतवादाच्या इतिहासात अशा अनेक स्त्रिया आढळतात.
इस्रायल-पॅलेस्टाइन भागात अनेक स्त्रिया दहशतवादी कृत्यात सामील झाल्याची उदाहरणे आहेत. त्यात साना मेहदली हिने 9 एप्रिल 1985 रोजी लेबेनॉनमध्ये इस्रायली सैनिकांच्या तुकडीवर स्वतःसह स्फोटकांच्या गाडीने हल्ला चढवला. “माझ्या मातृभूमीसाठी, माझ्या लोकांसाठी हे कर्तव्य पार पाडले’, असे तिने आधीच सांगितले होते. मुरीयल डेगॉक ही बेल्जियमची महिला पतीच्या विचारधारेच्या प्रभावात आल्यानंतर आत्मघातकी दहशतवादी बनली. तिने बगदादमध्ये 2005 मध्ये कारबॉम्बचा स्फोट घडवत मरण पत्करले. असेच एक उदाहरण झेर्मा मुझहाखोयेवाचे आहे. ही चेचन्याची दहशतवादी होती. तिच्या जवळचा बॉम्बच वेळेवर फुटला नाही त्यामुळे तिला अटक करण्यास पोलिसांना यश आले.
तिचे वैयक्तिक आयुष्य खूप कष्टात गेले. एका गटाकडून ती पैसे उसने घेऊ लागली होती. त्यांनी तिला सगळे कर्ज फेडण्यासाठी भरपूर रक्कम देऊ केली. त्या मोबदल्यात तिला दहशतवादाला प्रवृत्त केले. आणखी एक उदाहरण आहे वफा इद्रीस हिचे. ही पॅलेस्टाइनच्या निर्वासित छावणीत लहानाची मोठी झाली. वैयक्तिक समस्यांचा तोडगा मानसिक स्तरावर काढता न आल्यामुळे वैफल्यग्रस्त होती. नंतर स्वत:ला समाजात सिद्ध करण्यासाठी काही तरी करून दाखवण्याची मानसिक गरज तीव्र होत गेली. इस्रायालचा रागही तिच्या मनात होताच. अल अक्सा मार्तीयार ब्रिगेडने तिचा उपयोग करून घेतला. तिने 27 जानेवारी 2002 रोजी जेरुसलेममध्ये आत्मघातकी हल्ला चढवला. तसेच आयात अखरास ही बेथलहेम जवळच्या देहैशे निर्वासितांच्या छावणीत वाढली होती. दुसऱ्या इंतिफादाच्या वेळी इस्रायली डिफेन्स फोर्सकडून तिच्या कुटुंबातील काही जण जखमी झाले तर काही ठार झाले. तिच्या समोर तिच्या शेजारचा मित्र ठार झाला. यानंतर तिने बदला घेण्याच्या भावनेतून स्वत:ला स्फोटकांनी जेरुसलेम येथे उडवून दिले.
भारतात काही काळापूर्वी काश्मीरमध्ये “दुखतरान-इ-मिल्लत’ ही स्त्रियांची फुटीरतावादी संघटना असिया अंदराबी हिने सुरू केली होती. काश्मीरला भारतापासून स्वतंत्र करणे हे त्यांचे ध्येय होते. त्यांच्या देशद्रोही कारवायांमुळे त्यावर भारत सरकारने 2018 पासून बंदी घातलेली आहे. श्रीलंकेत लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल ईलम एलटीटीई या संघटनेने मोठ्या प्रमाणात स्त्रियांची भरती केली होती. त्यापाठोपाठ सगळ्यात जास्त महिला बोको हराम या नायजेरियातील दहशतवादी संघटनेने भरती केल्या आहेत.
स्त्रिया म्हणजे अतिशय कोमल मनाच्या किंवा करुणेची मूर्ती असे समीकरण समाजात असते. जेव्हा एखादी स्त्री दहशतवादी बनते तेव्हा समाजाला मोठा धक्का बसतो. हेच दहशतवाद्यांचे यश असते. आधुनिक काळात अनेक स्त्रिया आत्मघातकी दहशतवादी बनलेल्या आहेत. यामागे अनेक कारणे असतात. त्यात वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि आर्थिक कारणे मोठ्या प्रमाणात आढळतात. दहशतवादी संघटना अशा स्त्रियांना हेरतात. त्यांना वापरून घेतात.
वैयक्तिक कारणांमध्ये स्त्रीच्या भावनिक अवस्थेचा प्रभाव जाणवतो. विशेषत: पॅलेस्टाइनसारख्या धार्मिक मूलतत्त्ववादी पुरुषप्रधान रचनेत स्त्रियांवरती बरीच बंधने असतात. कुटुंबाची प्रतिष्ठा ही स्त्रियांच्या प्रतिष्ठेशी आणि राष्ट्राच्या प्रतिष्ठेशी जोडलेली आहे. काही स्त्रिया कुटुंबातील जाचाला कंटाळतात. काही जणी जे स्वातंत्र्य उपभोगायचे असते ते मिळेल म्हणून घराबाहेर संघटनांचे सदस्यत्व पत्करतात. काहींचे पती, प्रियकर, मुले हे सुरक्षारक्षकांकडून ठार झालेले आहेत. त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी काही वेळा स्त्रिया दहशतवादाकडे वळतात. समाजाने कमी लेखले म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी हा मार्ग स्वीकारल्याचीही उदाहरणे आहेत. काही घटस्फोटित स्त्रिया, काही विधवा स्त्रिया आत्मनाश करण्यासाठी सिद्ध होतात.
1987 मध्ये पहिला आणि 2000 मध्ये दुसरा उठाव म्हणजेच “इंतिफदा’ पॅलेस्टाइनमध्ये झाले. दहशतवादी संघटना या स्त्रियांना “हुतात्मा’ ठरवू लागल्या. त्यांना गौरवू लागल्या. काही स्त्रिया धार्मिक कारणांनी प्रेरित झाल्याचे इतिहासात आढळून येते. काहींना इंटरनेटवर गाठून त्यांना आपल्या जाळ्यात ओढले जाते. अशा प्रकारे सोशल मीडियाचा गैरवापर वाढलेला आहे. त्याविषयी जागरुकता निर्माण होणे गरजेचे आहे. बहुतांश वेळा स्त्रिया जेव्हा घर सोडून दहशतवादी संघटनांना जाऊन मिळतात तेव्हा त्या “सेक्स स्लेव्ह’ म्हणून वापरल्या जातात. लहान मुली-स्त्रिया या पुरुष दहशतवाद्यांसाठी हवी ती कामे करणे, घरातील कामे करणे, काही वेळा निरोप देवाण-घेवाण करणे यासाठी त्यांचा वापर केला जातो. एकदा घर सोडले की परतीचे मार्ग बंद होतात.
घरातील अतिजाचक नियम, कठोर शिस्त यामुळे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काही मुली घर सोडून संघटनांमध्ये सामील होतात. दहशतवादी संघटना काहींना प्रशिक्षण देऊन मारण्यासाठी आणि मरण्यासाठी सिद्ध करतात. कारण त्यांना मिळालेले ते अतिशय स्वस्त “शस्त्र’ असते. त्यांना आत्मघात करायला जी बौद्धिक कारणे लागतात, ती त्यांना पुरवली जातात. एखादे “मिशन’ कसे महत्त्वाचे आहे हे पटवून दिले जाते. त्याला हौताम्याची झालर चढवली जाते. मग एक दिवस त्या महिला दहशतवाद्याला मिशन गाठायला भाग पाडले जाते. काही वेळा जी महिला ऐनवेळी घाबरते ती नंतर सुरक्षा रक्षकांच्या हातात सापडते. अशा अनेक स्त्रिया इस्रायल-पॅलेस्टाइन भागात आहेत. त्यांच्यावर संशोधन करून मग दहशतवादाचा अभ्यास केला गेलेला आहे. भावनिक क्षमता लक्षात घेऊन कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधत वाटचाल करणे आवश्यक ठरते.