-हभप प्रशांत महाराज मोरे देहुकर
गोमटें कांहीं पावे । तरी संतोषें तेणें नाभिभवे । जो वोखटेनि नागवे । विषादासी ।। ऐसा हरिखशोकरहितु । जो आत्मबोधभरितु । तो जाण पां प्रज्ञायुक्तु । धनुर्धरा ।।
माऊली स्थितप्रज्ञाविषयी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणतात, चांगले काही मनासारखे प्राप्त झाले तरी तो संतोषाने आत्मसमर्पण करून पराभूत होत नाही आणि काही मनाविरुद्ध वाईट प्राप्त झाले तरी वाईटामध्येही दुःखाला जिंकतो.
अशा प्रकारे जो हर्षविषादरहित आत्मज्ञानाने परिपूर्ण असतो, ज्याची बुद्धी समाधीला प्राप्त झाली आहे तो स्थितप्रज्ञ असतो. म्हणजे तो सर्व विषयांविषयी सर्व प्रकारे अनासक्त असतो कारण कोणत्याही गोष्टीविषयी आसक्ती
दुःखाला कारण बनते. तो चांगले किंवा वाईट प्राप्त झाले तरी आनंद किंवा द्वेष करीत नाही. त्याची बुद्धी निरंतर आत्म्याच्या ठिकाणी स्थिर असते. कासवाप्रमाणे ज्याची इंद्रीये स्वाधीन असतात आणि त्याच्या इच्छेप्रमाणे वागतात, त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे.