कुणाचंही कीर्तन ऐकून आम्ही सुधारलो नाही, याची कबुली कार्तिकी एकादशीच्या मुहुर्तावर देण्यात काही गैर आहे, असं आम्हाला वाटत नाही. परंतु कुणाच्याही लावणीनं आम्ही बिघडलो नाही, हेही त्या मोबदल्यात सर्वांनी समजून घ्यायला हवं. लावणी हा आमचा पारंपरिक नृत्यप्रकार आहे.
वास्तविक आमची समृद्ध सांस्कृतिक ओळख म्हणून आपण ती अभिमानानं मिरवायला हवी होती. परंतु लावणी पाहायला जाणं हे जणू काही पाप आहे, असं आपण वर्षानुवर्षे मानत राहिलो. कलावंतांना प्रतिष्ठा मिळू दिली नाही. पुरुषांना बिघडवणारं एक उत्तान, अश्लील नृत्य यापलीकडे आपण लावणीचा विचारच केला नाही. अगदी जागतिकीकरणाच्या काळापर्यंत हीच स्थिती राहिली आणि नंतर आम्ही अचानक रातोरात बदललो. भारतीय तरुणींना “मिस इंडिया’ आणि “मिस युनिव्हर्स’ किताब मिळाल्यावर कमी कपड्यातलं रॅम्प वॉकिंग आम्हाला एकाएकी समर्थनीय वाटायला लागलं. अगदी तालुक्याच्या पातळीपर्यंत सौंदर्य स्पर्धा भरू लागल्या.
व्यापारी मार्गानं अशा अनेक गोष्टी आपल्या समाजात घुसल्या, ज्या लावणीपेक्षा कितीतरी उत्तान, अश्लील होत्या. त्यांनी आपल्या समाजाचं कितीतरी अधिक नुकसान केलं. परंतु जगाची बाजारपेठ वगैरे एक झाल्यामुळे जे घडतंय ते “अपरिहार्य’ आहे असं आमच्या डोक्यावर थापलं गेलं. बुद्धिवादी या घडामोडींकडे “सांस्कृतिक अभिसरण’ म्हणून पाहू लागले; पण लावणीसारख्या “आपल्या’ कलांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याबद्दल त्यांनीही “ब्र’ काढला नाही.
बदलत्या वातावरणात लावणीनं स्वतःला बदलून घेतलं आणि ढोलकीऐवजी ड्रम्स आणि ऑक्टोपॅड आले. पायपेटी जाऊन सिंथेसायजर आला. लावणीचं मूळ लावण्य दिसेनासं झालं आणि तीही “वेस्टर्न’ झाली. लावणी बघून फेटे उडवणारी पिढी अस्तंगत झाली आणि शाळेची कौलं फोडणारी पिढी तयार झाली. सांगली जिल्ह्यात घडलेल्या घटनेवर बरंच चर्वित्चरण झालेलं आहे. विद्यामंदिराची तोडफोड बघून अनेकजण अस्वस्थ वगैरेही झाले आहेत. एरवी झेडपीची शाळा म्हटल्यावर जे नाकाला रुमाल लावतात, तेसुद्धा हळहळले.
सोशल मीडियामुळे लोकप्रिय झालेली नृत्यांगना गावात येते आणि दीड-दोन हजार गावकरी जमतील अशी अपेक्षा असताना सात-आठ हजार लोक जमतात, हीच “डिजिटल क्रांती’ बरं का! लोकप्रिय होण्यासाठी कुणापुढे नाक घासण्याची आणि गर्दी जमवण्यासाठी जाहिरातबाजीची गरज राहिलेली नाही. अशैक्षणिक कामाच्या ओझ्याखाली दबलेल्या शिक्षकांनी लावणीवर ठेका धरल्यामुळे त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले. ज्या झाडावर माणसं चढून बसली होती, ते झाडही ओझ्याने कोसळलं. नाचणाऱ्या शिक्षकांना बघून सगळ्यांना “पिंजरा’ आठवला; पण हुल्लडबाजी म्हणजेच करमणूक, ही मानसिकता कशी तयार झाली, यावर कुणी चकार शब्द बोलायला तयार नाही. हीच हुल्लडबाजी आणि चेकाळलेपण राजकीय सभांपासून मिरवणुकांपर्यंत सगळीकडेच दिसतंय, त्याचं काय?
प्रायोजित हुल्लडबाजी म्हणजेच करमणूक आणि आक्रस्ताळेपणा म्हणजेच आक्रमकता, ही मानसिकता दृढ करणारी माणसं तुमच्या-आमच्यातलीच आहेत; परंतु एकमेकांचा कोथळा काढण्याची भाषा करून पुन्हा एकत्र नांदण्याची आणि आपल्यातल्या टोकाच्या वैमनस्याचं खापर मीडियावर फोडण्याची मुभा त्यांना आहे. आपल्याला असले “विशेषाधिकार’ नाहीत. याखेरीज काही ठराविक पेशातील लोकांनीच फक्त देवासारखं वागलं पाहिजे, अशी जणू नियमावलीच आपल्याकडे आहे. त्यामुळे लावणी शौकिनांनी आपली रसिकता फेटे उडवण्यापुरतीच मर्यादित ठेवलेली बरी..!