-अरुण गोखले
आजकाल आत्महत्येच्या बातम्या वाचल्या की मन कसे अगदी व्यथित होते. मनात असा विचार येतो, या लोकांना हे का लक्षात येत नाही की कोणतीही कृती करण्याच्या आधी माणसाने त्याचा दहादा विचार करायला हवा. त्याची एक अविवेकी कृती एका क्षणात सारे होत्याचे नव्हते करते.
एकदा का हातून कृती घडली की मग तिच्या चांगल्या वाईट परिणामास सामोरे जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. एकदा तोंडातून निघून गेलेला शब्द हा जर दुसऱ्याच्या जिव्हारी लागला तर तो रक्ताच्या थेंबासोबत दुखावलेल्या व्यक्तीच्या डोळ्यातून आसवेही गाळल्याशिवाय राहात नाही.
एकदा फुटलेला आरसा जसा पुन्हा जोडता येत नाही तसेच असते नातेसंबंधांचे, मैत्रीचे. इथलं प्रत्येक पाऊल हे विचारपूर्वकच उचलावे लागते. शब्द तोलून मापून वापरावे लागतात. कृती विचारपूर्वक करावी लागते. “मला तसे म्हणायचे नव्हते, माझा तसा हेतू नव्हता. मला हे असे काही घडेल हे अपेक्षित नव्हते’, असं म्हणून चालत नाही, कारण तोवर वेळ निघून गेलेली असते.
अविचारी वर्तन हे कधी तुमच्या माथी अपघाताची शिक्षा मारते. तुमची कौटुंबिक संसाराची घडी विस्कटून जाते, तर कधी तुमची सामाजिक प्रतिष्ठाही मातीस मिळवून जाते. यासाठीच सदैव सतर्क आणि सावध राहावे लागते. अपघात घडू नये म्हणून घेतलेली काळजी, वेगावर राखलेला संयम, व्यसनाधीन होण्याआधीच त्यापासून दूर राहण्याची घेतलेली खबरदारी, आजारपणाआधीच घेतलेली प्रकृतीची योग्य काळजी यासारख्या गोष्टी करणे फार गरजेचे असते. या संदर्भातील विवेक सोडू नका, अविचारी होऊ नका, हा बोध, ही शिकवण लक्षात घेऊन तसे वागणे हेच शहाणपणाचे असते. अविचाराने आपण आपले लाख मोलाचे जीवन, मित्र सहकारीही घालवून तर बसतोच आणि आयुष्यभर पश्चातापाची वेळ येते.
आपण मरून किंवा स्वत:ला संपवून जीवन समस्या सुटत नसतात. तर आपण आपल्या मागे अनेकांना दु:खी कष्टी, निराधार करून जातो. आत्महत्या ही सोडवणूक नाही तर ती जीवन संग्रामातून घेतलेली माघार आहे. तो पौरुषाचा भाग नाही तर पळपुटेपणाची कृती आहे. त्यासाठीच अनुभवी लोकांचे हेच सांगणे असते की बाबारे! कृती करण्याआधी विचार करा. नंतर पश्चाताप नको.