लोणी देवकर – इंदापूर तालुक्यातील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लोणी देवकर गावच्या हद्दीत एसटी बस आणि मारुती इको कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात मारुती गाडीमधील आठ जण जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृति गंभीर असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तळेगांव डेपोची एसटी (क्रमांक MH 14 BT 4568) पुणे – अक्कलकोट मार्गे निघाली होती. दरम्यान लोणी देवकर गावचे हद्दीत एसटीचा पुढील डाव्या बाजूचे चाक पंक्चर झाल्याने चालकाने एसटी रस्त्याच्या कडेला उभा केली होती. चाक बदलत असताना पाठीमागून वेगात आलेल्या मारुती इको गाडीने क्रमांक MH 06 CD 6259 एसटीला जोराची धडक देऊन अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार मारुती इको कार चालक पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने येत होता. दरम्यान लोणी देवकर गावचे हद्दीत रस्याच्या कडेला उभ्या असलेल्या एसटीला कार चालकाने पाठीमागून जोराची धडक देऊन हा अपघात झाला.
यात गजानन थिटे (वय ६५ वर्षे), गौरी गजानन थिटे (वय ५५ वर्षे), नथुराम गजानन थिटे (वय ३५ वर्षे), निवेदिता नथुराम थिटे (वय २६ वर्षे), ऋत्विक नथुराम थिटे (वय ४ वर्षे, सर्व. रा. बहे ता. रोहा), ओम वय (०८ वर्षे), भगवान आबाजी तुपकर (वय ६१ वर्षे), भारती भगवान तुपकर (वय ५० वर्षे, सर्व रा. मुठवली खुर्द ता.रोहा, जिल्हा रायगड) येथील रहिवासी आहेत. दोन जण गंभीर जखमी असून इतर किरकोळ जखमी असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान या अपघातानंतर इंदापूर पोलीस मदत केंद्राचे पोलीस कर्मचारी, इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार आणि त्यांचे सहकारी यांसह इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी अपघात स्थळी भेट देऊन जखमींची विचारपूस करत मदतकार्य केले आहे. यावेळी स्थानिक नागरिक अक्षय बाबर, सिद्धेश कोकाटे, शैलेश शिरसाट, अर्पण डोंगरे, अवी गायकवाड, गणेश सपकळ आदी अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले.
१०८ क्रमांक रुग्णवाहिकेला विलंब –
अपघात घडताच स्थानिकांनी अपघातग्रस्तांना बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी नेण्यासाठी नागरिकांनी १०८ क्रमांकावर फोन फिरविला. रुग्णवाहिकेला विलंब लागल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला.
लोणी उड्डाणपूल बनलाय मृत्यूचा सापळा
लोणी मधील या उड्डाण पुलावर सतत लहान मोठे अपघात घडत असतात.काही दिवसांपूर्वी खुद्द तहसीलदारांच्या गाडीला या ठिकाणी अपघात झाला होता. एस टी महामंडळाने सर्व एस टी पुलाखालून नेण्याची मागणी स्थानिकांनी वेळोवेळी केली आहे.परंतु याकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्याचे दिसत असल्याने वेळीच यावर तोडगा न काढल्यास स्थानिकांनी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.