लखनौ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पूर्वीच्या उत्तर प्रदेश सरकारांवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, पूर्वी सत्तेत असलेल्यांना लोकांचा विश्वास किंवा लोकांच्या गरजांची चिंता नव्हती आणि त्यांचा एकमेव अजेंडा राज्याची लूट हा होता अशी टिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या आधी मथुरा, आग्रा आणि बुलंदशहर येथील मतदारांना संबोधित करताना मोदी बोलत होते.ते म्हणाले, काही लोकांनी पैसा, मसल पॉवर, जातीयवादाच्या जोरावर कितीही राजकारण केले तरी त्यांना जनतेचे प्रेम मिळणार नाही असा स्पष्ट संदेश येथील जनतेनेच दिला आहे.
जे जनतेचे सेवक म्हणून काम करतात त्यांच्या पाठीशी जनता ठामपणे उभी राहते असा आपला विश्वास आहे असेही त्यांनी म्हटले आहे.समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आपण स्वप्नात भगवान कृष्ण पाहिल्याचे विधान नुकतेच केले होते त्यावर टीका करताना पंतप्रधान म्हणाले, भाजपला मिळालेला प्रचंड पाठिंबा पाहून या लोकांच्या स्वप्नात आता भगवान कृष्ण येऊ लागले आहेत.