मंचर येथे दूध उत्पादकांचा मोर्चा
मंचर – शेतकऱ्यांबाबत कळवळा दाखविणाऱ्या राज्य सरकारने दिलेली दूध दरवाढ फसवी असून, दूध उत्पादकांच्या डोळ्यात धूळफेक करणारी आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी केली.
सरकारने देऊ केलेल्या दूधदरासंदर्भात फसव्या घोषणेबाबत लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन मंचर (ता. आंबेगाव) येथे शुक्रवार (दि. 28) शेतकरी मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चामध्ये किसान कॉंग्रेसचे राजू बेंडे पाटील, कामगार नेते बाळासाहेब बाणखेले, गणेश खानदेशे, गणेश यादव, दिलीप पवळे, आम आदमी पक्षाचे वैभव टेमकर, वनाजी बांगर, सुनील वाव्हळ उपस्थित होते.
प्रभाकर बांगर म्हणाले, पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दुग्ध व्यवसाय केला जातो. शंभरहून अधिक संकलन केंद्रामार्फत दररोज सरासरी 20 ते 25 लाख लिटर दुधाचे संकलन केले जाते. गेल्या दीड महिन्यापासून दुधाचे दर कमी झाले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी दुधाला हमी बाजारभाव देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. त्यानुसार प्रतीलिटर 34 रुपये बाजारभाव देण्याची कार्यवाही सरकारने सुरू केली.
एक पॉइंट एसएनएफ कमी असेल तर एक रुपया व एक पॉइंट फॅट्स कमी असेल तर 50 पैसे दर कमी केले जात आहेत. त्यामुळे दीड रुपया कमी केला जात असल्याने शेतकऱ्यांना प्रत्यक्षात 29 ते 31 रुपये दर मिळत आहे. एसएनएफ व फॅटच्या नावाखाली प्रती पॉइंटला अनुक्रमे एक रुपया ते 50 पैसे कपात करून, शेतकऱ्यांची लूट करण्याचे धोरण दूध प्रकल्पांनी अवलंबिले आहे.
देवदत्त निकम यांनी केंद्र, राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली. यावेळी किसान सभेचे डॉ. अमोल वाघमारे, कॉंग्रेसचे अशोक काळे, उद्धव ठाकरे शिवसेनेचे राजाराम बाणखेले, अविनाश राहणे यांची भाषणे झाली. बाजार समिती मंचर येथून उपविभागीय तथा प्रांत कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. मोर्चाकऱ्यांचे निवेदन प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांनी स्वीकारले. मंचरचे पोलीस निरीक्षक बळवंत माडगे यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.