नदीकाठालगतच्यांना सतर्कतेचा इशारा
राजगुरूनगर – भोरगिरी-भीमाशंकर परिसरात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे चासकमान धरणात भीमा आणि आरळा नदीतून येणारे पाणी जमा होत आहे. चासकमान धरणात पाणीसाठा 93 टक्के झाला आहे. शुक्रवारी (दि. 28) सायंकाळी पाचच्या सुमारास धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले त्याद्वारे 3 हजार 490 हजार क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.
पावसाचा जोर वाढण्याच्या अंदाज वेध शाळेने दिल्याने या भागात अतिवृष्टी झाल्यास चासकमान धरणातून जादा क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येणार असल्याने नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. काठालगतच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे व चासकमान धरण प्रकल्प प्रशासनाने केले आहे.
खेड तालुक्यातील भामा आसखेड, चासकमान, कळमोडी या तीन धारणांपैकी कळमोडी व चासकमान धरण भरल्याने खेडसह शिरूर तालुक्यातील आगामी काळातील पाण्याचा प्रश्न सुटला आहे. भोरगिरी भीमाशंकर परिसरात दररोज जोरदार पाऊस पडत आहे. या आठवड्यात धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली.
दररोज पडणाऱ्या जोरदार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवारी (दि. 25) पासून धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे 400 क्युसेकने विसर्ग सोडला जात आहे. याद्वारे येथील वीज केंद्र कार्यान्वित झाले आहे. कालव्यात पाणी सोडल्याने खेड, शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.