पालघर – उत्तरेकडील पाकिस्तानात निर्माण झालेल्या धुळीच्या वादळाचा फटका महाराष्ट्रालाही बसत आहे. गुजरात मार्गे आलेल्या धुळीचे साम्राज्य मागील काही दिवसांपासून पालघरजवळील परिसराला सर्वत्र पसरले आहे. यामुळे काही दिवसांपासून थंडी, पावसाचे वातावरण आहे. दरम्यान, महिनाभरापासून महाराष्ट्रासह देशभरात कुठे दाट धुके, कुठे अवकाळी पाऊस, तर कुठे कडाक्याची थंडी पडत आहे.
पाकिस्तानातून सुटलेल्या धुळीच्या वादळ रविवारी राज्यात धडकले. हे धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रमार्गे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. यामुळे कोकणात पाऊस, तर मुंबई पुण्यासह महाराष्ट्रात थंड वारे सुरु झाले आहेत. यामुळे उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात धुळीचे साम्राज्य पसरले आहे.
याशिवाय मुंबई-पुण्यात धुलीकणांचे प्रमाण वाढल्याची नोंद झाली आहे. यामुळे वाहन चालविताना चालकांनी तसेच श्वसनाचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे. हे धुळीचे वादळ असल्याने पाकिस्तानातून आलेले धुलीकण हवेत पसरले आहेत. यामुळे समोरचे दिसणे कमी झाले आहे. शिवाय अधूनमधून ढगही ये-जा करत आहेत. यामुळे सूर्यप्रकाशही कमी प्रमाणात पसरला आहे. हे वातावरण पुढील दोन दिवस राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.