बेल्हे – जुन्नर तालुक्यात अवकाळी पावसाने द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच करोना संसर्गाची साथ आल्यामुळे मागील हंगामाचा शेवटही “कडू’ झाला. द्राक्षांची निर्यत थांबल्याने स्थानिक बाजारपेठेत कवडीमोल बाजारभाव मिळाला. तर उत्पादन खर्चही निघत नसल्याने अनेकांनी द्राक्षे बागेतच सोडून दिली. द्राक्षउप्तादकांचे संकट येथेच थांबत नाही. पाऊस अन् करोना या कारणांमुळे येणार हंगामही तब्बल दीड ते दोन महिने लांबण्याची शक्यता आहे.
जुन्नर तालुक्यातील जंबो, शरद सीडलेस, तास गणेश, थॉमसन या जातीच्या द्राक्षांना परदेशात चांगली मागणी असते. या द्राक्षांना परदेशात चांगला बाजारभाव मिळत असतो; परंतु या वर्षी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात करोनाचे सावट आल्याने निर्यात बंदी झाली. शेतकऱ्यांची द्राक्षे विक्रीअभावी तशीच पडून राहिली. यामध्ये शेतकऱ्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. 2019-20 चा हंगाम असा गेला आता येणारा 2020-21चा हंगामही धोक्यातच आहे. दरवर्षी द्राक्षांची छाटणी ही जुलै महिन्यात शेतकरी करीत असतात. ही छाटणी झाल्यानंतर साधारणपणे साडेतीन ते चार महिन्यांत द्राक्षे विक्रीसाठी बाजारात येत असतात. या द्राक्षांना साधारणपणे चांगला बाजारभाव मिळत असतो.
सध्या करोनाचे सावट कायम असल्याने अनेक बाजारपेठाच बंद आहे. त्यातच यावर्षीच्या हंगामात पाऊसदेखील उशीरा आला. ज्या शेतकऱ्यांनी आधी छाटणी केलेली होती. त्या शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता ज्या शेतकऱ्यांची द्राक्षांची छाटणी राहिलेली आहे, त्यांची देखील छाटणी आणखी लांबली आहे. शेतकऱ्यांनी छाटणी लांबवल्यामुळे झाडाला फळेदेखील उशीरा लागणार आहे.
तोपर्यंत करोनाचे सावट कमी होऊन बाजारपेठा सुरू होतील अशी भाबडी आशा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या वर्षी अवकाळी पावसाने व बदलत्या हवामानाणे द्राक्ष उत्पादनात घट झाली असून पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशाही परिस्थिती तालुक्यातील शेतकऱ्यांनी वेळच्यावेळी औषधे फवारणी करुन काही प्रमाणात हे पिक वाचविण्याचा प्रयत्न केला आहे.
जंबो या जातीच्या द्राक्षांचे उत्पादन राज्यात जुन्नर तालुक्यात सर्वाधिक निघते. जुन्नर तालुक्यात द्राक्ष लागवडीसाठी सुमारे साडेचार हजार ते पाच हजार एकर क्षेत्रावर लागवडी झालेल्या आहेत. यावर्षी अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या वर्षाच्या पेक्षा यावर्षी उत्पादन कमी निघणार आहे. सध्या हवामानात अनेकवेळा बदल झाल्याने तसेच कमी प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. ज्या शेतकऱ्यांची सप्टेंबर महिन्यात छाटणी होणार आहे, त्या बागेत पुढे ऑक्टोबर महिन्यात फळे धरायला उशीर होणार आहे.
-सतीष शिरसाठ, जुन्नर तालुका कृषी अधिकारी
सततच्या पावसामुळे पानगळ झालेली आहे. बागांमधून पाणी चालू आहे. सध्याच्या परिस्थितीतून मार्ग काढणे कठीण आहे. छाटण्या उशिरा होत असल्याने फळलागण उशिरा होणार आहे. त्यामुळे निर्यातक्षम द्राक्षे आणि देशी बाजारपेठेतील द्राक्षे एकाचवेळी बाजारात येतील. याचा परिणाम बाजारभावावर होणार आहे. द्राक्षबागेला खर्च लाखांमध्ये येत असतो. सलग दोन वर्षे द्राक्षबागायतदार अडचणीत असल्याने शासनाने द्राक्षबागायतदारांना पॅकेज स्वरुपात मदत करावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
-भूपाल माडीवाले, द्राक्षबागायतदार बेल्हे, ता. जुन्नर