मंचर (प्रतिनिधी) – सध्या कडक उन्हाळा असून उन्हापासून डोक्याचे संरक्षण व्हावे म्हणून जेष्ठ नागरिक, शेतकरी यांच्याकडून पांढऱ्या गांधी टोपीला मागणी वाढली आहे. तसेच विविध लग्न सोहळ्यांच्या कार्यक्रमातही पै, पाहुण्यांचा सत्कार सन्मान करण्यासाठी टोपीस मागणी वाढली असून टोपी व्यवसायिकांना चांगले दिवस आले आहेत.
सध्या उन्हाचा पारा मोठया प्रमाणात वाढला असून ग्रामीण भागात शेतकरी, जेष्ठ व्यक्ती उन्हापासून रक्षण व्हावे यासाठी डोक्यावर गांधी पांढरी टोपी वापरत आहे. तसेच लग्न सोहळ्यातही आलेल्या पाहुणे मंडळींचा टोपी, टॉवेल देऊन सन्मान, सत्कार केला जात आहे. पूर्वी लग्न सोहळ्यात फेटे मोठ्या प्रमाणात वापरले जात होते.
मात्र सध्या फेटे बांधले की पाहुणे फेटे काढून ठेवतात. तसेच उन्हाळा असल्याने उन्हापासून रक्षण व्हावे म्हणून कार्यमालक कापडी टोपीला पसंती देत आहेत. उन्हाळा व लग्न सराई सुरू असल्याने टोपीच्या मागणीत वाढ झाली असून चांगल्या प्रतीची २५/३० रुपयांना टोपी विक्री होत असल्याने टोपी बनवणाऱ्या कामगारांना सुगीचे दिवस आले आहेत.