तमाशा फडांसह छोट्या व्यावसायिकांच्या अर्थजनावर परिणाम
मंचर- करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरू असलेले लॉकडाऊन रविवार (दि. 3 मे) पर्यंत असल्यामुळे ग्रामीण भागात होणाऱ्या यात्रा भरणार नाही. त्याचा फटका यात्रांच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांसह तमाशा कलाकारांच्या उपजीविकेवर होणार आहे.
ग्रामीण भागात होणाऱ्या यात्रांमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असते. करोना रोगाच्या प्रभावामुळे सार्वजनिक उत्सवांवर पाणी फिरले असून, वर्षातून एकदा होणाऱ्या धार्मिक सणांवर गदा आली आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सार्वजनिक कार्यक्रम उत्सव, लग्न, यात्रा यांसारखे विविध कार्यक्रम रद्द केले आहेत. ग्रामीण भागात यात्रा-जत्रांच्या माध्यमातून लाखो रुपयांची वर्गणी गोळा होऊन त्यातून यात्रांचे नियोजन केले जाते. ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी तमाशा, आर्केस्टा, कीर्तन, कलगीतुरा असे कार्यक्रम आयोजित केले जातात. बहुतांश गावात उरलेली रक्कम गावातील धार्मिक स्थळांच्या तसेच शाळेच्या कामासाठी खर्च केली जाते.
ग्रामीण भागामध्ये वर्षातून एकदा ग्रामदैवतांच्या यात्रा होत असतात. यात्रेनिमित्त बाहेरगावी असलेले पुणे, मुंबईकर गावी येतात. यात्रांचे नियोजन यात्रा कमिटीच्या माध्यमातून गावातील पदाधिकारी करीत असतात; परंतु यंदा यात्रा रद्द झाल्याने या सगळ्याच धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अर्थकारणावर त्याचा अनिष्ट परिणाम झाला आहे.
- फडासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे?
यात्रा-जत्रा रद्द झाल्याने तमाशा कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. चैत्र पाडव्याला यात्रांसाठी तमाशांचे बुकिंग होत असते, ते यंदा झाले नाही. कित्येक तमाशा फडमालकांनी सावकारी कर्जे घेतलेली होती. ती कर्जे यंदा कशी फेडायची हे संकट त्यांच्या समोर उभे आहे. तमाशा फड मालकांना शासनाने मदतीसाठी पॅंकेज जाहीर करावे, अशी मागणी तमाशा फडमालंकांनी केली आहे.