अहमदाबाद – गुजरातमध्ये नव्याने संसर्ग होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत कमालिची घट झाली आहे. त्यामुळे तेथील प्रमुख 36 शहरांमधील रात्रीची संचारबंदी शिथील करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे.
मात्र दिवसाच्या निर्बंधांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. गांधीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी संचारबंदीच्या सुधारित वेळेसंदर्भात घोषणा केली.
शुक्रवारपासून गुजरातमधील 36 शहरात रात्री 9 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत नागरिकांचे व्यवहार सुरू होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. सध्या रात्री 8 ते सकाळी 6 या कालावधीत अहमदाबाद, सूरत, वडोदरा आणि राजकोटसह 36 36 शहरांमध्ये सध्या रात्रीची संचारबंदी सुरू आहे.
या शहरांमध्ये सध्या लागू असलेल्या दिवसाच्या निर्बंधांमध्ये कोणताही बदल होणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
गुजरातमध्ये करोना विषाणूच्या प्रादुर्भावाची दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत आहे. दिनांक 30 एप्रिल रोजी सर्वाधिक 14 हजार 600 नवीन रुग्ण संख्या नोंदवली गेली होती. तर आता दररोज 3,200 नवीन रुग्ण संख्या नोंदवली जात आहे.
त्यामुळे रात्रीची संचारबंदी शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे, असे रुपानी म्हणाले. यासंदर्भातील अधिसूचना गुरुवारी काढण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
मंगळवारी गुजरातमध्ये 3,255 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 44 जणांचा मृत्यू झाला. गुजरातमध्ये करोनामुळे आतापर्यंत 9,665 जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन सविस्तर कृती आराखडा लवकरच तयार केला जाईल, असेही रुपानी यांनी सांगितले.