मुंबई : देशात करोनाची दुसरी लाट आणि म्युकरमायकोसिसच्या संसर्गामुळे अनेकांचे जीव जात आहेत. त्यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. पंतप्रधानांच्या अहंकारामुळे देशाची स्मशानभूमी बनली असल्याची टीका पटोले यांनी केली आहे.
तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर नाना पटोले त्यानंतर अलिबाग येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची थट्टा करण्याचे काम केंद्र सरकारने आणि भाजपने केले . भाजपच्या अहंकारामुळे देशाची स्मशानभूमी बनली आहे. केंद्र सरकारचा ढिसाळपणा, नियोजन शून्यता, जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या नियमांचे पालन न करणे , यामुळेच देश स्मशानभूमी बनलीय.
देशातील कोरोना स्थितीमुळे पंतप्रधानांवर जागतिक पातळीवर टीका होत असल्याचेही नाना पटोले यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर पटोले यांनी भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले आहे. विदूषक कोण हे पश्चिम बंगाल आणि देशाने दाखवून दिले आहे. खरा हिरो कोण आहे हे ही जनताच ठरवेल, असे पटोले म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी त्यांच्या वाराणसी मतदारसंघातील डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी मोदी अत्यंत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले . तिसरी लाट भयंकर आहे. त्यामुळे या लाटेत लहान मुलांची काळजी घेण्याचा सल्ला मोदींनी या डॉक्टरांना दिला आहे. दरम्यान, ‘मोदी भावूक होऊ शकतात यावर विश्वास बसत नाही. मोदींचे खेला होबे सुरु होते. देशाला स्मशान केले आणि आज ते भाऊक होत असतील यावर विश्वास बसत नाही’, असा जोरदार टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे.
पंतप्रधान मोदींची प्रतिमा ढासळली आहे. त्यामुळे प्रतिमा सुधारण्यासाठी अश्रू ढाळत असतील तर जनता मान्य करणार नाही. बनारस मॉडेलमध्ये गंगेत मृतदेह वाहत आहेत. त्यांचं ते स्वप्न असेल तर त्यांना कळायला हवं की कुत्र्या-मांजरासारखं लोकांना मरायला सोडलंय. त्यांचा हा पॅटर्न आम्ही महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही, अशी घणाघाती टीकाही पटोले यांनी मोदींवर केलीय.