मुंबई : मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार उफाळून आल्यानंतर राज्यात दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा व्हिडिओ समोर आला आणि देशात एकच खळबळ उडाली. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मणिपूरमधील एका भाजप आमदाराबाबत केलेल्या ट्वीटने एका वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपचे आमदार पांगळे होऊन,स्मृतिभ्रंश होऊन हॉस्पिटलात पडलेत पण त्यांना पहायला एकही भाजप नेता गेला नाही असा आरोप जितेंद्रआव्हाड यांनी केला आहे.
भाजपाचे तीनवेळा आमदार, मणिपूरचे विद्यमान आदिवासी कल्याण मंत्री आणि कुकी समाजाचे नेते विंगझुगिन माल्ते आज पांगळे होऊन हॉस्पिटलात पडलेत. दंगेखोर मैतेईंनी लोखंडी सगळ्यांनी
त्यांना मारहाण केली. भाजपाचा एकही नेता त्यांना पहायला गेलेला नाही.“वापर करून झाल्यावर आम्हाला टाकून दिलं”,…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 25, 2023
याविषयी ट्विट करताना जितेंद्र आव्हाड यांनी, “भाजपाचे तीनवेळा आमदार, मणिपूरचे विद्यमान आदिवासी कल्याण मंत्री आणि कुकी समाजाचे नेते विंगझुगिन माल्ते आज पांगळे होऊन हॉस्पिटलात पडलेत. दंगेखोर मैतेईंनी लोखंडी सगळ्यांनी त्यांना मारहाण केली. भाजपचा एकही नेता त्यांना पहायला गेलेला नाही. “वापर करून झाल्यावर आम्हाला टाकून दिलं”, असं त्यांची पत्नी म्हणतेय” असा आरोप त्यांनी केला आहे.
तर तिकडे मणिपूरमधील स्थितीवर संसदेत चर्चा व्हावी यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. या मुद्द्यावर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मोठ्या प्रमाणात गदारोळ पाहायला मिळत आहेत. विरोधकांकडून पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारला मणिपूर मुद्द्यावर कोंडी केली जात आहे.
तसेच मणिपूर च्या मुद्द्यावर आपचे खासदार संजय सिंह यांनी राज्यसभेत आक्रमक भूमिका घेतली. त्यांना वारंवार सभापतींनी आवाहन करुनही त्यांनी वेलमध्ये येऊन गोंधळ घातला, त्यामुळं सभापतींनी त्यांना थेट संपूर्ण अधिवेशन काळासाठी निलंबित केलं आहे. यानंतर विरोधक अधिकच आक्रमक झाल्याचे पाहयला मिळालं.