पाणी हा आपल्या दैनंदिन जीवनातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. उत्तम आरोग्यासाठी दररोज किमान 3 ते 4 लीटर पाणी पिणे आवश्यक असते, असे डॉक्टरांकडून वारंवार सांगितले जाते. आता हे पाणी कशा पद्धतीने प्यायल्याने त्याचे शरीराला जास्त फायदे होतात हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. जुनं ते सोनं असं म्हणत असतानाच तांबे-पितळ आणि लोखंडी भांड्यांचा स्वयंपाकघरात वापर व्हायला हवा असे म्हटले जाते.
पाण्यासाठी विशेषत: तांब्याच्या भांड्याचा वापर केल्यास त्याचे आरोग्यास काही विशेष फायदे होतात. तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्यासोबत तांब्याची प्रक्रिया होते आणि ते पाणी अधिक आरोग्यदायी असते असे म्हटले जाते. पाहूयात तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने आराग़्याला नेमके कोणते फायदे होतात…
- कोलेस्टेरॉलची पातळी वाढणे, हृदयविकार या सध्या अतिशय सामान्य समस्या झाल्या आहेत. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने या समस्या काही प्रमाणात दूर होण्यास मदत होते.
- तांब्यामध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात, त्यामुळे पोटातील जीवाणूंचा नाश होतो. यामुळे पोट साफ राहून पचनक्रियेचा मार्ग मोकळा होण्यास मदत होते.
- ऍनिमिया ही सध्या भेडसावत असणारी आणखी एक समस्या आहे. तांब्यातील पाणी प्यायल्याने रक्तातील लोह वाढण्यास मदत होते. तसेच रक्तपुरवठाही सुरळीत होतो त्यामुळे ज्यांना ही समस्या भेडसावते त्यांनी जरूर तांब्यातील पाणी प्यावे.
- तांब्यामुळे मेलॅलिनची निर्मिती होण्यास मदत होते. त्वचेच्या पेशींसाठी मेलॅलिन हा अतिशय आवश्यक घटक असतो. त्यामुळे तांब्यातील पाणी प्यायल्यास त्वचेचा पोत चांगला राहण्यास मदत होते.
- सांधेदुखी ही सध्या अतिशय सामान्य तक्रार झाली आहे. तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने शरीरातील युरीक ऍसिड कमी होण्यास मदत होते. त्यामुळे सांधेदुखीच्या तक्रारीपासून आराम मिळण्यास मदत होते. अर्थायटीस किंवा सांधेदुखीच्या समस्या दूर होण्यास याची मदत होते.
- 8 तास पाणी तांब्याच्या भांड्यात ठेवल्यास त्यातील आवश्यक ते घटक पाण्यात उतरतात त्यात तुळशीचे पान टाकून ते प्यायल्यास कफाच्या समस्येपासून आराम मिळतो.