लहान मुलांना आपण सुरुवातीपासून जशा सवयी लावतो तशा लागतात. हीच गोष्ट त्यांच्या खाण्यापिण्याबाबतही लागू आहे. अगदी मूल जन्मल्यापासून त्याला वेळच्यावेळी आणि आरोग्यदायी खाण्याची सवय लावल्यास ती सवय कायम राहते. एका संशोधनानुसार, मुलांच्या खाण्याच्या वेळांचा त्यांच्या मानसिक वाढीशीही थेट संबंध असतो. या वेळा योग्य पद्धतीने पाळल्यास त्याचे त्यांच्या मानसिक, बौद्धिक जीवनावर अतिशय चांगले परिणाम होतात. तसेच मुलांना सुरुवातीपासून सर्व प्रकारच्या चवींची सवय लावल्यास त्याचा त्यांना आयुष्यभर उपयोग होतो.
यासाठी सगळे पदार्थ, भाज्या, धान्ये, कडधान्ये यांचा आहारात समावेश असणे आवश्यक असते. मूल लहान असल्याने सुरुवातीच्या टप्प्यात या सर्व गोष्टी पालकांवर अवलंबून असतात. कमीत कमी जंक फूडचे सेवन, वेळच्या वेळी योग्य पद्धतीने खाणे या सवयी मुलांच्या एकूण आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर ठरतात. पाहूयात याविषयीच्या आणखी काही टिप्स…
- एखादा पदार्थ खाताना त्या पदार्थात आरोग्याला आवश्यक असणारे कोणते घटक समाविष्ट आहेत याविषयी मुलांना माहिती द्यावी. त्यामुळे तो पदार्थ खाण्याची मुलांची गोडी नकळत वाढण्याची शक्यता असते.
- खाण्याची एखादी चुकीची सवय असल्यास मुलांवर ओरडू नका किंवा रागवू नका. त्यांना ते खाणे का योग्य नाही हे शांतपणे समजावून सांगा.
- मुलांना खाण्याच्या चांगल्या सवयी लागायच्या असतील तर पालकांना स्वत:च्या सवयींमध्येही काही प्रमाणात बदल करावे लागू शकतात. सतत चहा-कॉफीचे सेवन, फास्ट फूड किंवा पॅकेज्ड फूडचा अतिवापर यांमुळे मुलांवर नकळत ते संस्कार होतात.
- विविध प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, सर्व प्रकारची फळे, सॅलेड यांबाबत मुलांशी आवर्जून गप्पा मारा. या सगळ्या गोष्टींची त्यांना वेळोवेळी ओळख करून द्या.
- किराणा खरेदीला जाताना मुलांना घेऊन जा. जेणेकरून बाजारात मिळणारी सर्व प्रकारची धान्ये, डाळी, कडधान्ये यांची त्यांना माहिती होईल. यातील जास्तीत जास्त गोष्टींचा आहारात समावेश करण्याचा प्रयत्न करा.
- शाळेत गेल्यावर मुलांना काही गोष्टी स्वयंपाकघरात हाताने करण्याची सवय लावा. जेणेकरून तुम्ही घरी नसताना त्यांच्यावर मॅगी किंवा बाहेरचे खाण्याची वेळ येणार नाही.
- बाहेरगावी किंवा जवळपास काही वेळासाठी बाहेर जाताना मुलांना सोबत डबा ठेवण्याची सवय लावा. म्हणजे भूक लागल्यावर आता काय खायचे असा प्रश्न पडून शोधाशोध करावी लागणार नाही. त्यामुळे नकळत बाहेरचे खाण्यापेक्षा घरातील अन्न खाल्ले जाईल.