डासांचे साम्रज्य वाढले
नगर: शहरातील नाले-गटारांची साफसफाईच होत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे प्रभागांची अवस्था अत्यंत केविलवाणी असून, नागरिकांच्या हिताचा आव आणणाऱ्या महापालिका प्रशासनाला कर्तव्याचा विसर पडल्याचे चित्र दिसून येत आहे. साफसफाईच्या संदर्भात शहराचे केविलवाणे चित्र ध्यानात घेता महापालिकेचे प्रभाग अधिकारी आणि आरोग्य निरीक्षक झोपेत आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे.
महापालिका आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांचा अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे सध्या महापालिकेत जो तो आपल्या पद्धतीने कामकाज करीत असल्याचे चित्र आहे. घनकचरा व्यवस्थापनाचा पुरता बोजवाराच उडाला आहे. महापालिकेत मोठ्या संख्येने सफाई कर्मचाऱ्यांची भरती करू ठेवण्यात आली आहे. त्यात कंत्राटी कर्मचारी देखील आहेत. एवढी मोठी यंत्रणा असतांनाही साफसफाई होत नाही. सफाई कर्मचाऱ्यांकडून थातूर-मातूर स्वच्छता केली जाते. यामुळे सर्वत्र आनंदी आनंद आहे. मुख्य रस्ते, सार्वजनिक जागा, बाजारपेठ, खुली मैदाने तसेच प्रभागांमध्ये दैनंदिन साफसफाई होणे अपेक्षित असताना प्रभागात पंधरा-पंधरा दिवस सफाई कर्मचारी फिरकत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.आजही जागो-जागी कचऱ्यांचे ढिग साठलेले आहेत. हाच कचरा नाले, गटारींमध्ये पडून गटारी तुंबल्याचे चित्र आहे. गटारी तुंबल्याने गटारीचे पाणी आता रस्त्यावर वाहू लागले आहे.
शहरातील गल्ली बोळामध्ये दररोज कोठे ना कोठे गटारीचे पाणी रस्त्यावर वाहतांना दिसते. नाले व गटारींची साफसफाई होत नसल्याने शहरात ठिकठिकाणी काटेरी झुडपे वाढली असून, नाल्या-गटारे घाणीने तुडुंब साचली आहेत. नाल्या तुंबल्याने डासांची पैदास वाढली असून, नगरकरांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. संपूर्ण शहरातील चित्र पाहता, प्रभाग अधिकारी, आरोग्य निरीक्षक आणि संबंधित नगरसेवकांच्या कार्यशैलीवर नगरकरांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे.
लाखो रुपये कोणाच्या घशात?
दरवर्षी महापालिकेकडून मान्सूनपूर्व नाला सफाई केली जाते. तळ दिसेपर्यंत नाल्यांची स्वच्छता करण्याचा दावा महापालिकेकडून केला जात असतानाच अवघ्या सहा महिन्यांतच नाले घाणीने तुंबलेले दिसतात. नाला सफाईवर लाखोंचा खर्च होत असला तरी समस्या जैसे थे’ राहत असल्याने लाखो रुपये नेमके कोणाच्या घशात जातात, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने नाला सफाईच्या कामाचे जीओ टॅंगिग’करण्याची गरज आहे.
आरोग्य निरीक्षक नव्हे पांढरे हत्ती!
प्रभागातील दैनंदिन साफसफाईची पाहणी करून तसा अहवाल प्रभाग अधिकाऱ्यांकडे सादर करण्याची जबाबदारी आरोग्य निरीक्षकांवर निश्चित करण्यात आली आहे. बहुतांश आरोग्य निरीक्षक नगरसेवकांच्या इशाऱ्यानुसार काम करतात. शहरात स्वच्छतेची समस्या लक्षात घेता, आरोग्य निरीक्षकांना निव्वळ पोसण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येते.