राजगुरूनगर नगरपरिषदेचा पुढाकार : पुतळा परिसराची देखभाली अभावी दुरवस्था
राजगुरूनगर- येथील पुणे-नाशिक महामार्गावर भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा राजगुरूनगर नगरपरिषदेकडून “मास्टर प्लॅन’ तयार केला आहे. लवकरच या पुतळा परिसराचे सुसज्ज स्मारकात रूपांतर होणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी दिली. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीच्यावतीने गेली अनेक वर्ष पाठपुरावा केला होता त्यांच्या या पाठपुराव्याला यश येणार आहे.
राजगुरूनगरच्या वैभवात भर घालणारा भारतरत्न डॉ. आंबेडकर यांचा पुतळा येथील पुणे-नाशिक महामार्गावर एसटी बस स्थानकासमोर आहे; मात्र या पुतळ्याकडे शासकीय यंत्रणा, राजगुरूनगर नगरपरिषद यांचे मोठे दुर्लक्ष आहे. आंबेडकर पुतळा व पुतळा परिसराची मोठी दुरवस्था झाली आहे. त्याकडे प्रशासनाबरोबर दलित संघटनाचे मोठे दुर्लक्ष झाल्याने त्याची देखभाल योग्य पद्धतीने अजूनही होत नाही. त्यामुळे येथे काही काळ्या घटना घडल्या आहेत अजूनही घडत आहेत. पुतळा जागेचा वाद हा या विकासाला मोठा कारणीभूत ठरल्याने व तो अद्यापही न सुटल्याने पुतळ्याचे सुशोभीकरण रखडले होते.
हा मास्टर प्लॅन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार समितीचे अध्यक्ष अशोक कडलक, कार्याध्यक्ष संतोष डोळस, उपाध्यक्ष पी. के. पवार, कैलास केदारी यांच्या समेवत नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी नुकतीच बैठक घेत चर्चा करून तयार करण्यात आलेला मास्टर प्लॅनला मंजुरी दिली आहे. लवकरच नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या प्लॅन व संभावित आराखड्याला मंजुरी घेतली जाणार आहे. पुतळा परिसराजवळील अतिक्रमणे हटविण्यात येण्यासंबंधी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली जाणार आहे.
- 14 एप्रिल व 6 डिसेंबरलाच होते आठवण
डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील परिसरात वाढलेली झाडे-झुडपे, पुतळा परिसरात अंधाराचे साम्राज्य, दुर्गंधी आणि घाण, पुतळ्याजवळील तुटलेल्या संरक्षक भिंती, पुतळ्याला चार-आठ दिवसांपूर्वी घातलेले फुलांचे वाळलेले बाबांच्या गळ्यातील हार यामुळे शरमेने मान खाली जात आहे. इतकेच काय तर पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून हातगाड्या सुरू केल्या आहेत. केवळ 6 डिसेंबर आणि 14 एप्रिल वगळता येथील पुतळ्याकडे कोणी फिरकत नाही. दुर्लक्षित आणि अंधारमय पुतळ्याजवळ अनेक काळ्या घटना घडूनही प्रशासन मात्र उडवाउडवीची आणि निष्काळजीपणाची वक्तव्य करीत आहेत. त्यामुळे गेली अनेक वर्षांपासून पुतळा परिसर दुर्लक्षित राहिला आहे - विचार संवर्धन समिती आणि नगरपरिषद यांच्यात आता एकवाक्यता झाल्याने आम्ही मास्टर प्लॅन तयार केला आहे. सुप्रसिद्ध आर्किटेक्ट मंथन शेवाळे यांनी हा प्लॅन तयार केला आहे. लवकरच सर्वसाधारण सभेत तो सादर करून मंजुरी घेतली जाईल. त्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली जाणार आहे. पुतळा व पुतळा परिसराच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध केला जाणार आहे.
– शिवाजी मांदळे, नगराध्यक्ष, राजगुरूनगर नगरा परिषद - राजगुरूनगर येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व पुतळा परिसर सुशोभित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या डीपीडीसी अंतर्गत सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी वर्षभरापासून पाठपुरावा करीत आहे. शिवाय राज्य आणि केंद्राचाही निधीची मागणी केली आहे शहराच्या वैभवात भर पडेल असे देखणं स्मारक उभे केले जाणार आहे.
– अतुल देशमुख, सदस्य, जिल्हा परिषद - राजगुरूनगर येथील महमार्गावर असलेल्या पुतळ्याच्या परिसरात अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. पुतळा परिसर विकास करून त्यासाठी भरीव निधी मिळावा पुतळ्या जवळील अतिक्रमणे काढावीत. नगरपरिषदेने आता या परिसराच्या विकासाचा मास्टर प्लॅन केला आहे त्यास लवकर मंजुरी देऊन येथील विकास साधावा. समितीच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे आम्ही लढा देत आलो आहोत, आता कुठेतरी त्यास यश मिळत आहे.
– अशोक कडलक, अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती