कोपरगाव -करोनाच्या महामारीमुळे कोपरगाव शहर बाजारपेठेची आर्थिक परिस्थिती ढासाळली आहे. निर्बंध शिथील होत आहेत, हातावर प्रपंच असणाऱ्या घटकासमोर त्यांना दररोजच्या जगण्याचा प्रश्न मोठया प्रमाणात असतांना नगरपालिका प्रशासन शहरातील अगोदरच्या विस्थापितांचे पुर्नवसन करत नाही, आता पुन्हा नव्याने अतिक्रमण हटविण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने थेट नगर येथून पोलिसांची कुमक बोलावून गोरगरीबांच्या संसारावर जेसीबी फिरवून त्यांची राख रांगोळी करू नये, अशा आशयाचे निवेदन जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी अतिक्रमण धारकांच्यावतीने मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना सोमवारी दिले.
यावेळी बाळासाहेब संधान, विजय वाजे, सेनेचे गटनेते योगेश बागुल, भाजप गट नेते रवींद्र पाठक, शहराध्यक्ष दत्ता काले, विजय आढाव, बबलू वाणी, विनोद राक्षे, स्वप्नील निखाडे, मनसेचे शहराध्यक्ष सतिष काकडे, बापूसाहेब काकडे, अकबर लाला शेख, सनी वाघ, शरद खरात, रिपाईचे प्रदेश सचिव दिपक गायकवाड प्रदेश रिपाईचे शहराध्यक्ष देवराम पगारे, अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे सुकदेव जाधव, कैलास येवले, कहार भोई समाज प्रदेशाध्यक्ष अशोकराव लकारे यांच्यासह विविध टपरीधारक तसेच विस्थापीत टपरीधारक मोठया संख्येने उपस्थित होते.
नगररचनाचे अधिकारी बडगुजर यांनी या निवेदनाचा स्वीकार केला. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी कोपरगाव शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कोल्हे यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कोल्हे म्हणाले की, शहरातील अतिक्रमण धारकांच्या विरोधात कुणा एकाच्या सांगण्यावरून सुडबुध्दीतुन कारवाई होत असेल तर ते बरोबर नाही. मार्चमध्ये बसस्थानक इमारत उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला शहरातील अतिक्रमणधारकावर नाहक हातोडा उगारण्यात आला. त्यानंतर कृष्णाई मंगल कार्यालयात यावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय प्रमुखांना बोलाविण्यात आले होते. त्यानंतर मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांची दोन ते तीन वेळा बैठक घेऊन यावर सामोपचाराने तोडगा काढून पूर्वीच्या विस्थापितांचे अगोदर पुर्नवसन करावे, त्याचप्रमाणे अतिक्रमणधारकांवर हातोडा टाकू नये म्हणून विनंती केली होती.
शहरातील अतिक्रमणधारक त्यांच्या दैनंदिन रोजीरोटीसाठी रस्त्यावर माल विकतात मात्र वाहतुकीस कुठेही अडथळा होणार नाही, याची ते सतत दक्षता घेत असतात, पण कुणाला खुश करण्यासाठी पालिका प्रशासनाने पुन्हा पुन्हा अतिक्रमण उठविण्याची कारवाई करू नये, शहरासह मतदारसंघात कायदा व सुव्यवस्था ढासाळली आहे. अपघातांसह शहरात अवैध धंद्याचे प्रमाण वाढले आहे.
रात्री अपरात्री चोऱ्या, दरोडे, खुन मारामाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यावर नेमकेपणाने पोलीस प्रशासन व संबंधीत यंत्रण बघ्याची भूमिका घेत असतांना पालिका प्रशासन अतिक्रमण उठविण्यासाठी थेट नगर येथून पोलीस बळ मागावून सुडबुध्दीची कारवाई करत आहे, हे बरोबर नाही. तेव्हा पालिका प्रशासनाने अतिक्रमण उठविण्याची मोहीम तत्काळ स्थगित करावी, अन्यथा येथील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल, असा इशारा कोल्हे यांनी दिला.