तालिबाननेही पाकिस्तानला खडसावले
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर घेवून जाण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. त्यातच आता तालिबानने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये त्यांनी कलम 370 हटवण्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. तसेच भारत आणि पाकिस्तानला हिंसाचार होईल अशी पावले उचलण्यापासून दूर राहण्याची विनंतीदेखील केली आहे. तसेच पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा अफगानिस्तानसोबत जोडण्याचा प्रयत्न न करण्याची तंबीदेखील दिली आहे.तालिबानने जारी केलेल्या या प्रसिद्धीपत्रकामुळे अनेकांना आश्चर्य वाटले आहे.
काही आंतरराष्ट्रीय अभ्यासकांकडून तालिबानने प्रसिद्ध केलेले प्रसिद्धीपत्रक तपासून घेतल्यानंतर ते खरे असल्याचे भारत सरकारच्या सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. या प्रसिद्धीपत्रकामधून तालिबानने काश्मीरचा विषय अफगाणिस्तानशी जोडण्यास विरोध केला आहे. मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तान अफगाणिस्तानला काश्मीर मुद्द्याशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हाला युद्धाचा खूप वाईट अनुभव आहे. त्यामुळे शांतता बाळगा आणि प्रादेशिक मुद्दे सोडवण्यासाठी विवेकी मार्गाचा वापर करा. काश्मीरमधील असुरक्षितता संपुष्टात आणण्यासाठी दोन्ही देशांनी, ओआयसी, इस्लामिक देश आणि संयुक्त राष्ट्राने रचनात्मक तसेच विधायक भूमिका बजावावी असे तालिबानने ऑनलाइन प्रसिद्ध केलेल्या आपल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले आहे.