महापुरात जनता पिळून निघत असताना इच्छुकांना निवडणुकीचे वेध
– सचिन खोत
पुणे – जिल्ह्यातील सर्वात लक्षवेधी लढत होणार असलेल्या इंदापूर विधानसभेच्या आखाड्यात आता कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी शेंडी आणि पारंबीवर येऊन ठेपली आहे. एकीकडे पाऊस नसताना जनता पुरात पिळून निघत आहे. तर दुसरीकडे पाण्यासाठी टाहो फोडत आहे. सध्या जनतेला दिलासा देण्याची गरज असताना इंदापूरच्या उमेदवारीवरून विद्यमान आणि माजी आमदारांना उमेदवारीचे वेध लागले आहेत.
इंदापूर तालुक्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे गट तुल्यबळ आहेत. त्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्यात गतवेळी अटीतटीची लढत झाली होती. 2014 मधील राजकीय समीकरणे आणि परिवर्तनाची लाट याचा ताळमेळ घालून राष्ट्रवादी कॉंग्रेसने या गडावर सरशी केली होती. त्यापूर्वी लोकसभा निवडणुकीत माजी मंत्री पाटील यांची मदत घेऊन शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा विजय खेचून आणला होता. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. पाटील यांच्या मनात पराभवाची सल कायम असताना 2019 मधील लोकसभा निवडणुकीत ते विरोधाअस्त्र वापरतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, त्यांनी लोकसभेच्या आखाड्यात “तह’ केल्यानंतर खासदार सुळे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे माजी मंत्री पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तीन महिन्यांपासून त्यांनी मतदारसंघात धावता दौरा आणि जनतेशी संवादाची नाळ घट्ट केली आहे. त्याचा परिणाम सकारात्मक दिसू लागला आहे.
दोन दिवसांपूर्वी निमसाखर परिसरात झालेल्या एका कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांनी निर्वाणीचा इशारा म्हणून शेंडी आणि पारंबीची उपमा दिली आहे. त्यामुळे पाच वर्षांतील विस्कटलेली घडी आणि लोकसभेला केलेला तह या त्यांच्यासाठी जमेच्या बाजू ठरत आहे. त्यामुळे पाटील हे कार्यक्रमात सूचक इशारा देत आहेत.
सध्या इंदापूर तालुक्यात नीरा आणि भीमा नदीच्या महापुराने काठावरील गावे कवेत घेतली आहेत. विद्यमान आमदार भरणे आणि माजी आमदार पाटील हे पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी पूरस्थितीची पाहणी करीत आहेत. तालुक्यातील अनेक पाझर तलाव कोरडे ठाक पडले आहेत. तसेच पाऊस नसताना नदीकाठ महापुरात पिळून निघत आहे. यात दोन्ही कारभाऱ्यांकडून विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मॅरेथॉन दौरे निघत आहेत. इंदापूर तालुक्यातील अनेक तलाव कोरडे असताना त्यासाठी जनरेटा उभारण्याची तसदी घेतली जात नाही. बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात, अशी अवस्था झाली आहे. खडकवासला कालव्यात आवर्तन सोडून तलाव भरून घेण्याची गरज आहे. यासाठी कोणीही आक्रमक भूमिका घेत नाही. त्यामुळे विधानसभेची रंगीत तालीम सुरू असून इच्छुकांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. याचेच आश्चर्य जनतेत व्यक्त होत आहे.