भुवनेश्वर – ओडिशा राज्यात वारंवार वीज खंडित होत आहे. त्याच्या निषेधार्थ ओडिशातील कॉंग्रेस पक्षाने लोकांना अखंडित वीज पुरवठा मिळेपर्यंत थकीत वीजबिले न भरण्याचे आवाहन केले. ओडिशा प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सरत पट्टनायक यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणात सरकारच्या विरोधात निदर्शने केली.
उष्ण आणि दमट वातावरणात राज्यभर वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरीक वैतागले आहेत.त्यामुळे त्यांनी वीज पुरवठा करणाऱ्या भुवनेश्वरमधील ग्रिडको कार्यालयाला घेराव घातला. पट्टनायक म्हणाले की, राज्य सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वितरण कंपनीला 5,000 कोटी रुपये मंजूर केले आहेत. पण या कंपनीकडून अजून वीज पुरवठा सुरळीत होऊ शकलेला नाही.
वीज पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 20,000 कोटी रुपये राखून ठेवल्याचे सरकारकडून सांगितले जाते मग उर्वरित 15,000 कोटी रुपये कोठे आहेत, असा सवाल कॉंग्रेस नेत्याने केला आहे. लोक आपली कोणतीही चूक नसताना त्रास सहन करत आहेत असे ते म्हणाले. म्हणून अखंड वीज पुरवठा सुरू होईपर्यंत लोकांनी वीज बिलच भरू नये असे आवाहन त्यांनी केले.