मुंबई – मुंबईत आपले हक्काचे घर असावे असे प्रत्येकाला वाटते. या स्वप्नाला आज सुरुवात होतेय, आज भूमिपूजन होते आहे. लवकरच आपल्याला घरे देखील मिळतील. मात्र, अशी हक्काची घरे महापालिका किंवा सरकारच्या वतीने देत असतो तेव्हा माझी नेहमी एक अट असते की घर मिळवायला तुम्ही जो संघर्ष केलाय तो लक्षात ठेवा. हा संघर्ष कदापि विसरू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.
अनेकजण या क्षणाची वाट बघत बघत आपल्यातून निघून गेले. त्यांची आठवण ठेवा आणि ज्यावेळी तुम्ही आपल्या हक्काच्या या नव्या घरात पाऊल ठेवाल तेव्हा कृपया हे घर सोडून मुंबई सोडून जाऊ नका. नाही तर हा संघर्ष वाया जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
ते गोरेगावमधील सिद्धार्थनगर (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पातील प्रलंबित सदनिकांच्या बांधकामाचा शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.उद्धव ठाकरे म्हणाले, ही सर्व मेहनत वाया जाईल आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या. त्यामुळे जसा जिद्दीने तुम्ही हा संघर्ष केला आणि हा संघर्ष जिंकला. सुभाष देसाई केव्हाही भेटायला आले की त्या पत्रावाला चाळीचं काय? अशी विचारणा करायचे. एकएकजण असा मागे लागला म्हणून आजचा दिवस उजाडला असेही ते म्हणाले.