कोल्हापूर – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर रखडलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात खासदार संभाजीराजे छत्रपती सर्वपक्षीय खासदारांना घेऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार आहेत.
येत्या 2 सप्टेंबर रोजी ही भेट होणार आहे. संभाजी छत्रपती यांनी ट्विट करून तशी माहिती दिली आहे. यामुळे या भेटीत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविताना राष्ट्रपती व केंद्र सरकार यांची देखील भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याने संभाजीराजेंनी राष्ट्रपतींना मराठा आरक्षण प्रश्नी मराठा समाजाच्या भावना समजावून सांगण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानुसार त्यांनी 2 सप्टेंबर रोजी भेटीसाठी वेळ दिली आहे.
यावेळी सर्व पक्षीय प्रत्येकी 1 खासदार प्रतिनिधींने उपस्थित राहावे, यासाठी आज सर्व पक्षाचे अध्यक्ष व गटनेत्यांना पत्र पाठवली आहेत, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आरक्षणाबाबत तातडीने पाऊले उचलावीत, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 50 टक्के आरक्षणाची मर्यादा उठवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागणार आहे.
याबाबत सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींसमोर आपल्या भावना मांडणार आहे. त्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे काय सल्ला देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.