कोल्हापूर – मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारला जाग आणण्यासाठी 25 ऑक्टोबरनंतर मराठा समन्वयकांसोबत राज्यव्यापी दौऱ्याची सुरूवात करणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. तसेच आरक्षणप्रश्नी राज्य सरकारच्या समन्वय समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काहीही केलेले नाही. त्यामुळे या समितीवर काम करणारे नवीन लोक घ्यावेत, अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली.
कोल्हापूरातील जुना राजवाड्यातील तुळजाभवानी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी पत्रकारांशी बोलत होते. संभाजीराजे म्हणाले, आरक्षणाबाबत राज्य सरकारने मराठा समाजाला मुर्ख बनवू नये. आमची सहनशिलता पाहू नये. सरकारने आरक्षणाबाबत दिलेला आपला शब्द पाळावा अन्यथा उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
मराठा आरक्षणासाठी पहिला टप्प्यात राज्य सरकारने मागासवर्गीय आयोग स्थापन करणे, सर्वेक्षण करणे आवश्यक होते. पण, अद्यापही अशोक चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबत काही केलेले नाही. सरकारने असा खेळ करून चालणार नाही. आरक्षणासाठीचा लढा आता पुन्हा सुरू केला जाईल. त्याची सुरूवात राज्यव्यापी दौऱ्याने होईल. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पनवेल, रायगड, सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये दौरा होणार असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.
ते म्हणाले, गप्प बसणे अथवा काठी हातात घेणे यावरून मवाळ आणि आक्रमकता ठरत नाही. कायदा हातात घेऊन आक्रमकता दाखवणे मला पटत नाही आणि छत्रपती घराण्याला शोभतही नाही. भविष्यात आक्रमकपणाची झलक दिसेल. आता सरकारसमवेत चर्चेला जाणार नाही. लोकांना वेठीस धरण्यापेक्षा वेळ आलीच, तर मूकमोर्चा, लॉंगमार्च आणि आझाद मैदानात उपोषणाची माझी वैयक्तीक तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.