चित्रपटसृष्टीतील कलाकारांबाबत विशेषतः विवाहित कलाकारांबाबत सर्वसामान्यांना नेहमीच एक प्रश्न पडत असतो. तो म्हणजे हे कलाकार जेव्हा अन्य अभिनेत्याबरोबर अथवा अभिनेत्रीबरोबर इंटिमेट सीन्सचे चित्रीकरण करतात तेव्हा त्यांच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदारांना काय वाटत असेल?
हा प्रश्न पडणे अत्यंत स्वाभाविक आहे आणि त्याचं उत्तरही सोपं आहे. कितीही आधुनिक विचारांचे असले तरी प्रत्येकाच्या आतमध्ये कुठे ना कुठे तरी पझेसिवनेस असतो. त्यामुळेच सुरुवातीला का होईना या कलाकारांच्या जोडीदारांना काहीसं ते रुचत नाही. पण कालांतरानं तो अभिनय आहे हे लक्षात आलं की मनातलं वादळ शांत होतं. असंच काहीसं आयुष्मान खुरानाच्या पत्नीबाबत म्हणजे ताहिरा कश्यपबाबतही घडलं. ती सांगते सुरुवातीला आयुष्मानचे एखाद्या अभिनेत्रीसोबतचे इंटिमेट सिन्स पाहायचे तेव्हा मला खूप असुरक्षित वाटायचं.
खास करुन “विकी डोनर’मधील यामी गौतमीसोबतचे त्याचे सिन्स पाहून मी खूप अस्वस्थ झाले होते. पण हळूहळू मी वास्तव स्वीकारत गेले आणि पूर्ण बदलूनही गेले. आता मला जराही असुरक्षित वाटत नाही. उलट “अंधाधुन’चे एडिट पाहताना मी त्या टीमला म्हणाले की, आयुष्मान आणि राधिकाचे इंटिमेट सीन्स यामध्ये खूप कमी वाटताहेत! माझ्यात हे परिवर्तन होण्याचं कारण म्हणजे आयुष्मानवरील विश्वास. मी त्याला 18 वर्षांपासून ओळखते आणि मला आज त्याची पत्नी असल्याचा खूप अभिमान वाटतो.