पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादनासाठी जास्त गर्दी होऊ नये, अशी विनंती अधिकाऱ्यांनी केली आहे. त्याला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी दि. 1 जानेवारीला कोरेगाव भीमा येथे अभिवादनासाठी गर्दी करू नये.
करोनाबाबतीत नियमांचे पालन करून अनुयायांनी अभिवादनासाठी यावे,’ असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पुणे शहराच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपमहापौर सुनीता वाडेकर, रिपाइंचे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर,
संपर्कप्रमुख अशोक कांबळे, अशोक शिरोळे, ऍड. आयुब शेख, ऍड. मंदार जोशी, सचिव महिपाल वाघमारे, असीत गांगुर्डे, संजय सोनवणे, निलेश आल्हाट, मोहन जगताप श्याम सदाफुले, जयदेव रंधवे आदी उपस्थित होते. यावेळी दलित पॅंथर चळवळीतील यशवंत नडगम यांनी कार्यकर्त्यांसमवेत रिपाइंमध्ये प्रवेश केला.
यावेळी आठवले म्हणाले, “कोरेगाव भीमा स्तंभाजवळील 20 हेक्टर जमीन शासनाने जमीन मालकांना योग्य मोबदला देऊन ताब्यात घ्यावी. त्या जागेवर आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावे. पुरातत्व
खाते, पर्यटन खात्याच्या वतीने तेथे स्मारक उभे राहावे. अनुयायांना केवळ एक जानेवारीलाच नव्हे, तर कायम येता येईल, दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था उभारावी. ग्रंथालय, संग्रहालय उभारावे आदी मागण्या केल्या आहेत.’