ठाणे – मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनाचा चेहरा ठरलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या रात्री उशिरा होणाऱ्या सभांवरून काही ठिकाणी आयोजकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यावर जरांगे यांनी तीव्र हरकत घेत शांत राहूनही आमच्यावर मुद्दामहून गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप केला आहे. आम्ही शांत राहूनही आमच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. त्यामुळे सरकारला राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवायची नाही का? असा सवाल जरांगे यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. (Maratha Arakshan)
जरांगे यांची मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाणे जिल्ह्यात सभा झाली. या सभेतून त्यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. मी समाजाला शांत राहण्याचे आवाहन करत आहे. पण आमच्यावरच गुन्हे ठोकले जात आहेत. त्यामुळे सरकारच त्यांना पुढे करत आहे का? असा प्रश्न आम्हाला पडत आहे. विशेषतः सरकारलाच राज्यात दंगली भडकावून आणायच्या आहेत का? असा सवालही या प्रकरणी उपस्थित होत आहे, असे जरांगे यांनी म्हटले आहे.
मराठा समाज अडचणीच्या काळात एकमेकांना मदत करतो. त्यामुळे नेत्यांच्या राजकीय स्वार्थासाठी आपण आपल्यात वाद होऊ द्यायचा नाही. दंगली होऊ द्यायच्या नाही. सरकारने कितीही गुन्हे दाखल केले तरी आम्ही थांबणार नाही. राज्यातील शांततेसाठी आमच्यावर गुन्हे दाखल होत असतील, तर असे कितीही गुन्हे आम्ही अंगावर घेऊ, असेही जरांगे यावेळी म्हणाले. (Manoj jarange in thane)
शिंदेंच्या शब्दांचा दोनदा मान राखला
मराठा समाजाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दांचा दोनदा मान राखला. आताही मुख्यमंत्री शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे वेळेची मागणी केली. आम्ही त्यांना 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली. त्यानंतर आम्ही कुणाचेच ऐकणार नाही. आम्हाला या मुदतीपूर्वी आरक्षण हवे आहे. हे प्रशासन रात्रंदिवस अलर्ट असते. मोर्चे, यात्रा, रॅली, सभा हे सर्वकाही दिवसरात्र सुरू आहे. क्रिकेटही रात्रीच सुरू असते. त्यामुळे आम्हीही रात्रंदिवस लोकांच्या घरी जातोय. शांततेची बाजू मांडतोय. राज्यात शांतता नांदावी असा आमचा प्रयत्न आहे. पण काहींना राज्यात दंगली घडाव्यात असे वाटत आहे, असेही मनोज जरांगे यावेळी बोलताना म्हणाले.