मुंबई – राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी त्रिपक्षीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या बैठकांमध्ये राज्यातील साखर कारखान्यांमधील कामगारांच्या मागण्याबाबत सामजंस्य करार झाला.
हा करार महाराष्ट्रातील साखर व उपपदार्थ उद्योगातील दिनांक 1 एप्रिल 2019 व त्यानंतर हजेरी पत्रकावर असलेल्या सर्व कायम, हंगामी कायम व हंगामी कामगारांना लागू करण्यात आला आहे.
या करारानुसार आता या कामगारांना अस्तित्वात असलेल्या मूळ पगार, महागाई भत्ता, स्थिर भत्ता मिळून 12 टक्के पगारवाढ करण्यात आली असल्याने राज्यातील सर्व साखर कामगारांची दिवाळी गोड झाली असल्याचे समाधान ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.
या निर्णयान्वये दिनांक 1 एप्रिल 2019 रोजी संबंधित कामगारांच्या वेतनश्रेणीत 12 टक्के पगारवाढ म्हणजे अस्तिवात असलेल्या पगाराच्या 12 टक्के देण्यात येणार आहे. या शिवाय फिटमेंट बेनिफिट देण्यात येणार आहे.