नगर – राज्यांमध्ये माहे ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या महा चक्रीवादळामुळे तसेच अवेळी पावसामुळे राज्यातील 34 जिल्ह्यातील 325 तालुक्यांमधील शेतपिकांच्या नुकसान पोटी राज्य शासनाने मदत जाहीर केली आहे. यामध्ये नगर जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात 135 कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहेत.त्याचे वाटप सांख्यिकी क्रमानुसार गावनिहाय केले जात आहे. सदर तहसीलदारांनी ते संबंधीत शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने वर्ग करावेत असे आदेश जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी दिले आहेत.
राज्यामध्ये अवेळी झालेल्या पावसामुळे नगर जिल्ह्यामध्ये मोठे नुकसान झाले होते. साधारणत तीन लाख 71 हजार हेक्टरवर नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. प्रशासनाने तसेच तलाठी व महसूल यंत्रणेने तसेच कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे केले होते.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नुकसानीचे पंचनामे केल्यानंतर एकत्रित अहवाल हा राज्य शासनाकडे पाठवला होता. राज्य शासनाने नुकसान झालेल्या गावांना मदत देण्याचा निर्णय घेऊन मदत जाहीर केली आहे. नगर जिल्ह्यामध्ये साधारणत 475 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये फळपिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. शासनाने मदतीचे निकष बदलल्याने 475 ऐवजी 449 कोटी मदत जिल्ह्याला मिळणार आहे.
राज्य शासनाने पहिल्या टप्प्यातील अनुदान जाहीर केले आहे. बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करताना जो काही शासन निर्णय दिलेला आहे त्याचे काटेकोरपणे पालन करावे अशा सूचना दिल्या आहेत. निधीचे वितरित केल्यानंतर तसेच रक्कम वाटप झाल्यानंतर लाभार्थी यादी त्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी असे निर्देश सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. नगर जिल्ह्यासाठी 135 कोटी रुपयांच्या अनुदान येथील प्रशासनास प्राप्त झाले आहे.