आदिवासी भागांत गेली १७ वर्षे शिक्षक आणि पालक यांच्यात समन्वय
ओतूर – येथील ग्राम विकास मंडळ ओतूर संचलित चैतन्य विद्यालयाने सलग 17 वर्षे “शिक्षक आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम राबवून विद्यार्थी आणि पालकांबरोबर संवाद साधला आहे. शिक्षकांनी सहा दिवसांत इयत्ता दहावीच्या 275 मुला-मुलींच्या पालकांशी संवाद साधून त्यांची शालेय प्रगती व प्रथम सत्र परीक्षेतीत गुण यावर चर्चा करून विद्यार्थांच्या अडचणी समजावून घेऊन मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पानसरे यांनी दिली.
गेले सहा दिवस हा उपक्रम सुरू असून, शिक्षकांची तीन पथके करण्यात आली असून, प्रत्येक पथकात दहा शिक्षकांचा समावेश आहे. रोज रात्री 7 ते 11 या वेळेत शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या शालेय अडचणींवर चर्चा करून एकूण 18 पालक सभांतून मार्गदर्शन करण्यात येत आहे.
या उपक्रमात जी पथके आहेत त्या पथकांचे गटसमन्वयम म्हणून भाऊसाहेब खाडे, प्रतिक अकोलकर, ब्रम्हदेव घोडके हे काम पाहत आहेत. ही पथके मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पानसरे, उपमुख्याध्यापक संजय ढमढेरे, बबन डुंबरे, ग्राम विकास मंडळाचे सचिव प्रदीप गाढवे, पंकज घोलप, शिक्षक प्रतिनिधी संतोष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पालक सभा घेत आहेत.
उपक्रमातून कळते पाल्यांची प्रगती
विद्यालयात दहावीच्या परीक्षेस बसलेले अनेक विद्यार्थी आदिवासी, दुर्गम भागातून, वाड्या-वस्त्यांमधून येतात. या विद्यार्थ्यांचे पालक कष्टकरी, शेतकरी, आदिवासी व शेतमजूर असून, त्यांना शाळेत येऊन आपल्या पाल्याचा शालेय प्रगतीचा आढावा घेणे शक्य होत नाही. अशा पालकांना आपल्या पाल्याची शालेय प्रगती कळावी, तसेच पाल्याची व पालकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
पटसंख्येत वाढ
या उपक्रमात शिक्षक विद्यार्थांच्या घरी जाऊन शिक्षक, बालक व पालक अशा प्रकारची बैठक घेऊन प्रथम सत्र परीक्षेत मिळालेले गुण व शालेय अडचणी यांवर चर्चा केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढून त्यांच्या गुणांमध्ये वाढ होते. या उपक्रमांत सातत्याने दहावीचा निकाल आणि पटसंख्या वाढत आहे. पाचवी ते दहावी पटसंख्या 1620 आहे.