पुणे : “शिक्षण संस्थांमधून ज्ञानाबरोबरच संस्कारही मिळायला हवेत. ‘सूर्यदत्त’सारख्या संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत आहेत. समाजातील आदर्श व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्याचा उपक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आहे. समाजहितासाठी, विश्वाच्या कल्याणासाठी आपण प्रत्येकाने योगदान द्यायला हवे,” असे प्रतिपादन कर्नाटकाचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी केले. जीवनमूल्यांच्या अनुकरणातूनच भारताचे उज्ज्वल भविष्य घडेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
सुर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या 24व्या स्थापना दिवसानिमित्ताने सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे ‘सुर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’ व ‘सुर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन गेहलोत यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरविण्यात आले. बावधन (पुणे) येथील सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमधील सुर्यभवन येथे झालेल्या या सोहळ्याला अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक अध्यक्ष आचार्य डॉ. लोकेश मुनिजी, भजनसम्राट अनूप जलोटा, ‘सुर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, कार्यकारी विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, संचालक स्नेहल नवलखा, सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सच्या संचालक डॉ. किमया गांधी उपस्थित होते. विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
‘सुर्यदत्ता राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’ प्रशासकीय सेवेतील कार्याबद्दल निवृत्त पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव, पर्यावरण संवर्धनातील कार्याबद्दल कर्नल (नि.) सुरेश पाटील, सूक्ष्म, लघु व माध्यम उद्योगातील बदलांसाठी योगदान दिल्याबद्दल ‘जीतो’चे संस्थापक ललित गांधी, सहकार व सामाजिक उद्योजकता क्षेत्रातील कार्याबद्दल सुरेश कोते, वैद्यकीय सामाजिक सेवेबद्दल डॉ. राजेश गादिया, मानवता व बंधुतेच्या प्रसारासाठी बंधुताचार्य प्रकाश रोकडे, जागतिक उद्योग आणि सीएसआर क्षेत्रातील कार्यासाठी मुकेश मोदी यांना प्रदान करण्यात आला.
‘सूर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार’ ‘बीव्हीजी’चे व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड (कॉर्पोरेट एक्सलन्स), उद्योजक चंद्रकांत साळुंके (एसएमई प्रोत्साहन), रोटेरियन डॉ. सिमरन जेठवानी (महिला सक्षमीकरण, दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन (सामाजिक कार्य), सौरभ बोरा (आर्थिक व आध्यात्मिक सेवा), सॉलिसिस लेक्सचे व्यवस्थापकीय भागीदार ऍड. अमित मेहता (कायदा व न्यायव्यवस्था) आणि ग्लोबल डिजिटल मीडिया तज्ज्ञ भाव्या श्रीवास्तव यांना प्रदान करण्यात आला.
थावरचंद गेहलोत म्हणाले, “शिक्षणाला उद्योजकतेची, सामाजिक भानाची जोड द्यायला हवी. गुणवत्ता वाढीसाठी तंत्रज्ञान महत्वाचे आहे. डिजिटल लर्निंग, इनोव्हेशन, स्टार्टअप, मेक इन इंडिया यासारखे उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडत आहेत. नवीन शिक्षण धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर, नीतीमूल्यांवर भर दिला असून, मातृभाषेतून शिक्षण घेण्याची संधी दिली जात आहे. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थी यांना दर्जेदार शिक्षण घेण्यास मदत होणार आहे. आधुनिक, मूल्याधिष्ठित आणि सर्वांगीण विकासाचे शिक्षण देण्याचे कार्य सूर्यदत्त संस्था करीत आहे. याच पद्धतीचे शिक्षण सर्व संस्थांनी दिले, तर भारत विश्वगुरू बनण्यास वेळ लागणार नाही.”
सूर्यदत्त संस्थेने निवड केलेल्या पुरस्कारार्थींचे कार्य विद्यार्थ्यांना प्रोत्साहक ठरेल, असे सांगून गेहलोत म्हणाले, “कला, क्रिडा, साहित्य, विज्ञान, माहिती तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रात समर्पक भावनेने काम करून या पुरस्कारार्थींनी आपल्यासमोर आदर्श ठेवला आहे. देशाचा सर्वांगीण विकास साधताना विविध क्षेत्रात काम होताना दिसत आहे. देशाला वेगळया उंचीवर घेवून जाण्यासाठी प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात समर्पक भावनेने काम करावे.”
आचार्य लोकेश मुनी म्हणाले, “या व्यक्तिमत्त्वांना सन्मानित करण्यामागील कारण आपण सर्व विद्यार्थ्यांनी समजून घेतले पाहिजे. निःस्वार्थ भावनेतून समाजाच्या, देशाच्या जडणघडणीत या व्यक्तींनी योगदान दिले आहे. भारताच्या भूमीत इतके सुंदर कार्य होतेय, याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देताना मूल्याधिष्ठित, रोजगाराभिमुख शिक्षण देण्याचे कार्य प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्या नेतृत्वात होत आहे. समाज उत्थानाचे हे कार्य असेच अविरतपणे चालत राहावे.”
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “मुलांवर लहानपणापासूनच चांगले संस्कार व्हावेत, त्यांची बौद्धिक, मानसिक तसेच भावनिक वाढ व्हावी, त्यांची सर्वांगीण जडणघडण व्हावी, याकरिता त्यांना विविध क्षेत्रातील लोकांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची ओळख व्हायला हवी. याच उद्देशाने सूर्यदत्त जीवनगौरव व राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातून ही आदर्श व्यक्तिमत्त्व समोर आणत असतो. शिक्षण, सामाजिक, आरोग्य, उद्योग, प्रशासन, साहित्य आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १४ रत्नांना आज सन्मानित करताना आम्हाला आनंद होतो आहे.”
कार्यक्रमानंतर झालेल्या भजनसंध्या कार्यक्रमात सादर केलेल्या भजनांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. संचालक प्रशांत पितालिया यांनी सूत्रसंचालन केले. समूह संचालक डॉ. शैलेश कासंडे यांनी आभार मानले.