सातारा – शासनाने 18 एप्रिल 2023 पासून रोजी विमा कंपनी विरहीत योजनेची निर्मिती करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राज्यामध्ये सुरु केली आहे. या योजनेत अपघाती मृत्यूसाठी दोन लाख रुपये तर अपघाती अपंगत्वासाठी एक लाख रुपये संरक्षण देण्यात येत आहे. त्यासंदर्भात पात्र शेतकरी, वारसांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कृषि पर्यवेक्षक अथवा तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या मार्फत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्रीमती फरांदे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील दि. 18 एप्रिल ते 31 ऑगस्ट 2023 या कालवधीतील 54 प्रस्ताव शासनाने नुकतेच मंजूर केले असून एक कोटी आठ लाख रुपये इतकी रक्कम संबंधित दावेदारांच्या बॅंक खाती नुकतीच जमा करण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. यामध्ये सातारा तालुका- मंजूर दावे – 9, जमा रक्कम- 18 लाख रुपये, कोरेगांव तालुका- मंजूर दावे- 13, जमा रक्कम- 26 लाख रुपये, खटाव तालुका- मंजूर दावे -4, जमा रक्कम-8 लाख रुपये, कराड तालुका- मंजूर दावे – 4, जमा रक्कम-8 लाख रुपये, पाटण तालुका- मंजूर दावे – 3, जमा रक्कम-6 लाख रुपये, वाई तालुका-मंजूर दावे -2, जमा रक्कम-4 लाख रुपये, जावली तालुका- मंजूर दावे -5, जमा रक्कम-10 लाख रुपये, महाबळेश्वर तालुका- मंजूर दावे – 4, जमा रक्कम-8 लाख रुपये, खंडाळा तालुका- मंजूर दावे – 5, जमा रक्कम-10 लाख रुपये, फलटण तालुका- मंजूर दावे – 3, जमा रक्कम-6 लाख रुपये, माण तालुका- मंजूर दावे – 2, जमा रक्कम-4 लाख रुपये.
यापूर्वी शेतकरी अथवा त्यांच्यावतीने अन्य कोणत्याही संस्थेने वेगळी विमा योजना केली असल्यास अथवा विमा उतरविला असल्यास त्याचा या योजनेशी काही संबंध राहणार नाही. या योजनेंतर्गत मिळणारे लाभ स्वतंत्र असतील. योजना कालावधीत संपूर्ण दिवसासाठी म्हणजेच विहित कालावधीतील प्रत्येक दिवसाच्या 24 तासासाठी ही योजना लागू राहील. या कालावधीत शेतकऱ्याचा केव्हाही अपघात झाला तरी तो विमा योजनेतर्गत लाभासाठी पात्र राहील.या योजनेंतर्गत ग्राह्य अपघातांचे प्रकार- रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, जंतूनाशक अथवा अन्य कारणाने विषबाधा, विजेचा धक्का अपघात, विज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात वा मृत्यू, सर्पदश/ विंचूदंश, बाळंतपणातील मृत्यू, नक्षलवाद्याकडून झालेली हत्या, जनावरांच्या चावण्याने हल्ल्यामुळे जखमी, मृत्यू. जनावरांच्या चावण्याने रेबीज होऊन मृत्यू, जखमी होऊन मृत्यू, जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू होऊन शव न मिळणे, दंगल, अन्य कोणतेही अपघात यांचा समावेश आहे.